बाबासाहेबांची हाक अन् ३० किलोमीटरचा पायी प्रवास

By Admin | Updated: October 22, 2015 00:58 IST2015-10-22T00:58:38+5:302015-10-22T00:58:38+5:30

अशातच १४ आॅक्टोबर १९५६ ला नाग नगरीत धम्मदीक्षा कार्यक्रमाची घोषणा बाबासाहेबांनी केली आणि दलित जनतेला दीक्षा समारंभाला येण्याकरिता...

The journey of Babasaheb's 30 km road | बाबासाहेबांची हाक अन् ३० किलोमीटरचा पायी प्रवास

बाबासाहेबांची हाक अन् ३० किलोमीटरचा पायी प्रवास

धम्मदीक्षेचे साक्षीदार सूर्यभान कांबळे : बाबासाहेबांचे स्वप्न आजही अधुरेच
धम्मचक्र प्रवर्तन दिन विशेष

राजकुमार चुनारकर  खडसंगी
अशातच १४ आॅक्टोबर १९५६ ला नाग नगरीत धम्मदीक्षा कार्यक्रमाची घोषणा बाबासाहेबांनी केली आणि दलित जनतेला दीक्षा समारंभाला येण्याकरिता अनेक गावात माहिती देण्यात येत होती. याच माध्यमातून चिमूर तालुक्यातील लावारी (चौरस्ता) या दीडशे लोकसंख्येच्या गावातील सूर्यभान कंबळे यांना धम्मदिक्षा समारंभाची माहिती झाली. कार्यक्रमाला जायचे तर आहेच, पैसे पण नाही, मग काय? बाबासाहेबांची हाक आली आणि चक्क ३० किलोमीटरचा प्रवास पायी चालत जावून बाबासाहेबांचे याची देही याची डोळा दर्शन घेत धम्मदिक्षा समारंभात साक्षीदार झाले.
पेशवाईच्या काळापासून भारतातील दलित समाजावर होणारे अत्याचार असहृ्य झालेले तेव्हाचे अस्पृश्य समाजाचे घटक ज्यांना १९५६ च्या बाबासाहेबांच्या आव्हानाने जणू काही अन्यायाच्या बेड्या तुटणार असल्याची चाहूल लागली होती, चिमूर तालुक्यातील शंकरपूरपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या लावारी (चौरस्ता) येथील दिडशे लोकसंख्येच्या गावात जन्मलेले सूर्यभान जयराम कांबळे आज ७४ व्या वर्षीही स्वाभीमानाने शंकरपूर येथे मोलमजुरी करुन अर्धांगिनी कौशल्याबाईसह सहजीवन जगत आहेत. लोकमत प्रतिनिधीने धम्मदिक्षेचे साक्षीदार म्हणून त्यांना बोलके केले असता त्यांनी आपल्या बाणेदार स्वाभीमानी शैलीत अनेक आठवणींना उजाळा दिला. लावारी या गावात काम नसल्याने कामाच्या शोधात मध्यप्रदेशातील माईन कंपनीमध्ये कामासाठी १५ व्या वर्षी घर सोडले. काम करीत असताना १४ आॅक्टोबर १९५६ ला बाबासाहेब नागपूरला येऊन दिक्षा देणार असल्याची माहिती मिळाली. दिक्षा समारंभाला जायचे ठरविले. मात्र खिशात दमडी नाही. जायचे कसे, असा प्रश्न पडला. मात्र बाबासाहेबांच्या हाकेला ‘ओ’ देत चक्क ३० किलोमीटरचे अंतर पायदळ जात त्यांनी दिक्षा समारंभात हजेरी लावली होती. बाबासाहेबांचे तोंडून पडलेले ते शब्द ‘ज्यांना माझेकरवी बौद्ध धर्माची दिक्षा घ्यावी असेल त्यांनी हात जोडून उभे राहावे’’ कानी पडताच जनसागर हात जोडून शांतीत उभा झाला. काय बाबासाहेबांचे भाषण! काय कणखर आवाज! प्रत्येक शब्द अन् शब्द स्पष्ट!
आत्मविश्वास, दृढनिश्चय बाबासाहेबांची वाणी ज्यांनी ऐकली, बाबासाहेबांकडून त्रिशरण आणि पंचशीला घेवून जे लाखो लोक बौद्ध झाले, ते धन्य होत, असे सूर्यभान कांबळे स्वाभीमानाने सांगतात.

१६ वर्षाचा असताना कांबळे यांनी जन्मगावी लावारी (चौरस्ता) येथे पंचशील झेंडा रोवला. यासाठी त्या काळच्या अनेकांनी विरोध केला. मात्र काही सहकार्यांना घेऊन त्यांनी पुढाकार घेत तो झेंडा रोवला व तो आजही दिमाखात उभा आहे. यासाठी त्या काळात १५ कुडव धान व २५ रुपये गोळा करुन मिरवणूक काढली व गावागावांतील २२ प्रतिज्ञाचे वाचन करुन दाखविले. त्यांच्या गावात विटाळ पाळण्यात येत होता. दलितांना विहिरीवर पाणी भरण्यास मज्जाव करण्यात येत होता. एकदा विहिर बाटवली म्हणून काही इतर जातीतील व्यक्तींनी भांडण केले. तेव्हा त्यांनी प्रतिकार केला.

Web Title: The journey of Babasaheb's 30 km road