हे तर लबाडांचे सरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:41 IST2017-11-16T00:41:10+5:302017-11-16T00:41:39+5:30

राज्यातील सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्तेपूर्वी भाजपाने अनेक आश्वासने दिली.

It's a false government | हे तर लबाडांचे सरकार

हे तर लबाडांचे सरकार

ठळक मुद्देशरद पवार यांची टीका : निफंद्रा येथील शेतकरी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
सावली/गेवरा : राज्यातील सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्तेपूर्वी भाजपाने अनेक आश्वासने दिली. मात्र या आश्वासनांची पूर्तता करण्याऐवजी दिशाभूल करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे हे लबाडांचे सरकार आहे, अशी टीका माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बुधवारी निफंद्रा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
मंचावर माजी राज्यमंत्री अनिल देशमुख, माजी राज्यमंत्री रमेशचंद्र बंग, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, आ. प्रकाश गजभिये, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबासाहेब वासाडे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, सेवादलाचे कार्याध्यक्ष जानबाजी मस्के, सतीश इटकेलवार, राकाँचे तालुकाध्यक्ष दामू नन्नावरे, सिंदेवाहीचे तालुकाध्यक्ष अविनाश राऊत, माजी जि.प. सदस्य यशवंत ताडाम, गडचिरोली जि.प.च्या सभापती भाग्यश्री आत्राम, गुलाब गावंडे व मेळाव्याचे आयोजक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार उपस्थित होते.
यावेळी पवार म्हणाले, महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना ७२ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. यासाठी अतिशय सोपी पद्धत वापरून शेतकºयांना न्याय दिला. मात्र भाजप सरकारने कर्जमाफीसाठी वारंवार निर्णय बदलविले. चुकीची पद्धत स्वीकारून शेतकºयांची अडचण केली. नोटाबंदी करून देशाच्या अर्थव्यवस्थेला तडा दिला. त्याचे परिणाम जनता भोगत आहे. त्यामुळे भाजपा सरकारविरूद्ध आता जनआक्रोश निर्माण होत असून या लबाड सरकारला जनता धडा शिकविणार आहे.
शेतकरी कधीच कर्ज बुडवत नाही. सारे आयुष्य प्रामाणिकपणे राबणाऱ्या शेतकऱ्यांवर भाजपने अन्याय केल्याचा आरोपही शरद पवार यांनी यावेळी केला.
अधिवेशनात बघू
शेतकºयांच्या कर्जमाफीसंदर्भात भाजपा सरकारने अन्याय केला. कर्जमाफीचा लाभ किती शेतकºयांना झाला, हे सरकारलाच माहीत नाही. कर्जमाफीच्या प्रश्नावरून येत्या हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारण्यात येणार आहे. शेतकºयांच्या हिताचे निर्णय घेतले नाही तर अधिवेशन चालू देणार नाही, असा इशाराही खा. शरद पवार यांनी यावेळी दिला.

Web Title: It's a false government