सांडपाण्यामुळे इरई झाली गटारगंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST2019-12-25T05:00:00+5:302019-12-25T05:00:33+5:30
चंद्रपूर शहराची लोकसंख्या ५ लाखांच्या घरात पोहचली आहे. शहरातून इरई व झरपट या दोन नद्या वाहतात. झरपट नदीचे तर डोळ्यादेखत दूरवस्था होत असतानाही प्रशासन, लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक संघटना यापैकी कुणीही या ही दूरवस्था थांबवू शकले नाही. अनेक ठिकाणी या नदीचा चक्क नाला झाला आहे.

सांडपाण्यामुळे इरई झाली गटारगंगा
रवी जवळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहर झपाट्याने विकसित होत आहे. असे असले तरी येथील सांडपाण्याचे अद्यापही पाहिजे तसे नियोजन होत नसल्याने इरई नदी डोळ्यादेखत प्रदूषित होत आहे. चंद्रपूर शहराला दररोज १४० एमएलडी पाणी लागते. यातील ८५ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया न करताच इरई नदीत जाते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला तर धोका उद्भवत आहेच; सोबत शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
चंद्रपूर शहराची लोकसंख्या ५ लाखांच्या घरात पोहचली आहे. शहरातून इरई व झरपट या दोन नद्या वाहतात. झरपट नदीचे तर डोळ्यादेखत दूरवस्था होत असतानाही प्रशासन, लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक संघटना यापैकी कुणीही या ही दूरवस्था थांबवू शकले नाही. अनेक ठिकाणी या नदीचा चक्क नाला झाला आहे. बाबुपेठ, महाकाली तसेच एमईएल अशा काही प्रभागातील सांडपाणी झरपट नदीत विसर्जित होते. याशिवाय या नदीकाठावर झोपडपट्टी परिसर अधिक असल्याने शौचालयाची घाणही याच नदीत जाते. त्यामुळे ही नदी प्रदूषित झाली आहे. येथील पाणी कधीही पिण्यायोग्य नाही. या पाण्याचा वापर पिकांसाठी होत असल्याने भाजीपाला पिकांवरही परिणाम होत आहे.
इरई नदी वाहती आणि मोठी आहे. चंद्रपूरकरांना पिण्याचे पाणीही या नदीतून मिळते. चंद्रपूरची तहान भागविणारी नदी असतानाही या नदीकडे नागरिकांनी दुर्लक्ष करणे सुरू केले. कोळसा खननातून वेकोलिने टाकलेले महाकाय मातीचे ढिगारे व नागरिकांचे अतिक्रमण आणि कारखान्यांच्या रसायनमिश्रित पाण्यामुळे ही नदी अरुंद व दूषित झाली. विशेष म्हणजे, रहमतनगर, सिस्टर कॉलनी, नगिनाबाग परिसरात इरई नदीच्या पूरबुडित क्षेत्रातच नागरिकांनी घरे बांधून रहिवास सुरू केला आहे. अनेक वर्षांपासून ते या ठिकाणी राहत आहेत. या वस्त्यातील सांडपाणी थेट इरई नदीच्या पात्रात जाते.
मागील काही वर्षांपासून चंद्रपुरात मनपाकडून भूमिगत मलनिस्सारण योजनेचे काम सुरू आहे. मात्र अद्याप ही योजना फलद्रुप झालेली नाही. या योजनेतंर्गत २०१७ मध्ये रहमतनगर परिसरात २५ एमएलडी क्षमतेचे तर पठाणपुरा परिसरात ४५ एमएलडी क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र निर्माण करण्यात आले.
या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र चंद्रपूर शहरात दररोज १४० एमएलडी पाणी वापरले जात असताना केवळ ७० एमएलडी सांडपाण्यावरच प्रक्रिया केली जाते.
ही माहिती महानगरपालिकेची असली तरी वास्तविक याहून कमी सांडपाण्यावर प्रक्रिया होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे सुमारे ७० टक्के सांडपाणी थेट इरई नदीत जाते. शहरी सांडपाण्यामध्ये मलमूत्र, आईल, ग्रिस, औषधे, किटकनाशके, डिटर्जंट, प्लास्टिक, तसेच कोली, बॅक्टरिया, विषाणू असतात.
सांडपाण्यावर प्रक्रिया हाच उपाय
चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होतो. सुमारे १४० एमएलडी सांडपाणी शहरातून बाहेर पडते. हे सांडपाणी थेट नदीत जात असल्याने मानवी आरोग्य व शेतपिकांवर विपरित परिणाम होत आहे. यासंदर्भात नागरिकांनीही अनेकदा तक्रारी केल्या. त्यामुळे या सांडपाण्यावर प्रक्रिया करणे हा या समस्येला सोडविण्यासाठी एकमेव पर्याय असल्याचे पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पाणी शेतीसाठी अपायकारक
शहरातील सांडपाणी प्रक्रिया न करताच इरई नदीत सोडले जाते. हे पाणी रहिवासी क्षेत्र व शेतीसाठी उपयोग केला जातो. यामुळे पिके खराब होत आहेत. भाजीपाला, फळे या पिकांना हे पाणी वापरल्याने व ते नागरिक खात असल्याने आरोग्यावर परिणाम होत आहे. दूषित पाणी जमिनीत मुरुन ते नदी, विहिरी, कुपनलिका आदी पेयजल स्रोतात जाते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे.
कोळसा खाणीचेही पाणी नदीत
जल प्रदूषण कायदा १९७४ कलम ३३ प्रमाणे कोळसा खाणीचे प्रदूषित पाणी नदीत किंवा नाल्यात सोडता येत नाही. परंतु वेकोलिने याकडे कधीच लक्ष दिले नाही. कोळसा खाणीतील प्रदूषित रसायनयुक्त पाणी थेट इरई नदीत सोडले जात आहे. याशिवाय चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील रसायनयुक्त पाणीदेखील काही प्रमाणात या नदीत जाते. त्यामुळे हे पाणी दूषित होत आहे.