वादळी पावसाने जिल्ह्यात अतोनात नुकसान

By Admin | Updated: May 7, 2016 01:22 IST2016-05-07T01:22:01+5:302016-05-07T01:22:01+5:30

सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना वादळी पावसाने नाकीनऊ आणले आहे. एक दिवसाआड जिल्ह्यात वादळी पावसाचे तांडव सुरू आहे.

Incessant damages in the district due to turbulent rain | वादळी पावसाने जिल्ह्यात अतोनात नुकसान

वादळी पावसाने जिल्ह्यात अतोनात नुकसान

चंद्रपूर : सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना वादळी पावसाने नाकीनऊ आणले आहे. एक दिवसाआड जिल्ह्यात वादळी पावसाचे तांडव सुरू आहे. यात नागरिकांचे, वनसंपदेचे व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. गुरुवारी रात्री चंद्रपूरसह ब्रह्मपुरी, सिंदेवाही, मूल, बल्लारपूर, भद्रावती, चिमूर तालुक्यात वादळी पावसाने जोरदार थैमान घातले. यामुळे जिल्ह्यातील शेकडो झाडे उन्मळून पडली. वीज तारा तुटल्या. अनेक गावांना गुरुवारची रात्रही अंधारात घालवावी लागली.
चंद्रपुरात रात्री ८.३० वाजताच्या सुमारास वादळ सुरू झाले. त्यानंतर वादळासोबत पावसालाही सुरूवात झाली. या वादळामुळे झोपडपट्टी भागातील घरांचे किरकोळ नुकसान झाले. चंद्रपूर-मूल मार्गावर संजयनगरजवळ मोठे झाडे कोसळून मार्गावर आले. यामुळे रात्री वाहतूक प्रभावित झाली होती. याशिवाय अनेक वॉर्डातील झाडेही उन्मळून पडली. चंद्रपुरातील अनेक भागातील वीज पुरवठा रात्री दोन तास ठप्प होता.
वीज सेवा विस्कळीत
मूल : ऐन उन्हाळ्याच्या दिवसात वादळी पावसाने थैमान घातले असल्याने मूल तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येते. विजेचा कडकडाटात वादळी पाऊस गुरुवारी रात्री आलेल्या वादळामुळे तालुक्यात १५ विद्युत खांब तसेच तारा तुटल्या. मूल बसस्थानकाचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. येथील उपकार्यकारी अभियंता पंकज होनाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष लक्ष घालून वीज सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे. अचानक आलेल्या वादळी पावसाने मात्र वीज सेवेसोबतच जनजीवन विस्कळीत झाले. विजेचा कडकडाट असला तरी कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र विद्युत व्यवस्था विस्कळीत झाल्याचे दिसून आले. ज्याठिकाणी ग्रामीण भागात झाडे पडली आहेत, तेथील विद्युत पुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित होता. रात्री विद्युत कर्मचारी युध्दस्तरावर काम करीत होते.
बल्लारपुरात जोरदार पाऊस
बल्लारपूर : गुरुवारला दुपारी बल्लारपूर भागात आभाळ स्वच्छ आणि निरभ्र होते. सायंकाळी ७ वाजेपर्यंत हेच वातावरण होते. मात्र, अर्धा तासात वातावरण बदलले सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अर्धा पाऊण तास पाऊस-वादळाने चांगले झोडपले. आता कधी आकाशात ढग जमतील आणि वादळासह पाऊस बरसेल याचा नेमच उरला नाही. गेल्या कितीतरी वर्षानंतर वादळी पावसाचा असा अनुभव जनतेला बघायला मिळत आहे. या सततच्या वादळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला असून त्यामुळे, लोकांना दिलासाही मिळत आहे. मात्र अनेकांचे नुकसानही होत आहे.
सलग तीन दिवस वादळाचे थैमान
ब्रह्मपुरी : सलग तीन दिवसांपासून ब्रह्मपुरी तालुक्यात वादळाने थैमान घातल्याने जनजिवन विस्कळीत झाले आहे. परंतु तुरळक प्रकारची हानी वगळता फार मोठे नुकसान असे पाहणीवरून दिसून आले आहे. दिवसभर शांत रुपात असलेले चित्र सायंकाळी मात्र बदलत जाते. दिवसभर ऊन्ह किंवा ढगाळ वातावरण अशा स्वरूपाचे चित्र निर्माण झाले असताना सायंकाळी अचानक आभाळ भरुन येणे, वादळ सुटणे व काहीअंशी पाण्याच्या धारा कोसळणे हे सध्या सातत्याने सुरु आहे. त्यामुळे विजेच्या तारा तुटून काही काळ वीज पुरवठा खंडीत होऊन नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.या वादळाने सर्वाच्या मनात सध्या भितीचे वातावरण निर्माण केले आहे. गुरुवारी सायंकाळी ब्रह्मपुरीत अनेक कार्यक्रम होते. या कार्यक्रमाला वादळी पावसाचा मोठा फटका बसला. अन्नाची नासाडी व पेंडॉलची अवस्था दयनीय झाल्याने कार्यक्रमावर विरजण पडल्याचे दिसून आले.
झाडे कोसळली
भद्रावती : तालुक्यातील चंदनखेडा परिसरात सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने अनेक झाडे उन्मळून पडली. मुधोली येथील सरस्वती विद्यालयाच्या काही खोल्यांवरील टिन उडून गेले. मुधोली ते काटवल (तु) रस्त्यावरील विजेचे खांब पडल्याने विजेच्या तारा लोंबकळू लागल्या. वाहतूक बंद होती.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पालाही फटका
चंद्रपूर : मोहुर्ली येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रिसोर्ट, डारमेंट्रीलाही वादळी पावसाचा तडाखा बसला. वादळामुळे छत उडून किमती साहित्याची नासधूस झाली असून यात २५ लाखांचे नुकसान झाले आहे. रिसोर्टचे छत उडाल्याने पर्यटकांना इतरत्र सुरक्षित जागी हलविण्यात आले. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वार असलेल्या मोहुर्ली येथे वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या तीन डारमेंट्री, सहा रिसोर्ट रुमचे छत उडून गेले. छतासह खिडक्या, लाकडी साहित्य, फर्निचर, काचेच्या वस्तूंची नासधूस झाली. रिसोर्टमध्ये मलेशिया येथील किमती लाकडाचा वापर केला गेला आहे. वादळी वाऱ्याने हे लाकूड नष्ट झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे एमटीडीसीचे जवळपास २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती व्यवस्थापक महादेव हिरवे यांनी दिली. वादळी वारा सुरु झाल्यानंतर पर्यटनासाठी जंगलात गेलेल्या पर्यटकांना आहे, त्या जागेवरच थांबविण्यात आले. रिसोर्ट, डारमेट्रीचे नुकसान झाल्याने तेथील पर्यटकांची तातडीने पर्यायी व्यवस्था करण्यात आली. वादळी वाऱ्याने मोहुर्ली येथेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Web Title: Incessant damages in the district due to turbulent rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.