आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांकरिता विदर्भात बांधणार वसतिगृह : मकरंद अनासपुरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 23:36 IST2018-02-06T23:35:32+5:302018-02-06T23:36:16+5:30
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे कुटुंब उघड्यावर पडल्यास पाल्यांचा शिक्षणाचा प्रश्न बिकट होतो.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांकरिता विदर्भात बांधणार वसतिगृह : मकरंद अनासपुरे
आॅनलाईन लोकमत
वरोरा : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे कुटुंब उघड्यावर पडल्यास पाल्यांचा शिक्षणाचा प्रश्न बिकट होतो. अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण व्हावे, याकरिता नाम फाऊंडेशनच्या वतीने विदर्भात वसतिगृह सुरू आहे, अशी माहिती सिनेकलावंत मकरंद अनासपुरे यांनी मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
भद्रावती येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित ‘उलट सुलट’ नाट्यप्रयोगासाठी आमदार बाळू धानोरकर यांच्या वरोरा येथील निवासस्थानी भेट दिली होती. मकरंद अनासपुरे म्हणाले, नाना पाटेकर आणि मी नाम फाऊंडेशनची स्थापना केली. कोरडवाहू शेतकऱ्यांकरिता आम्ही लोकसहभागातून काम करीत आहोत. लोकसहभागातून सिंचनाची वाढ झाल्यास शेतकरी दोन पिके एका वर्षात घेवून समृद्ध होवू शकतील. यातून आत्महत्येचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. लोकसहभागामुळे या उपक्रमाचे महत्त्व समाजाला कळेल, असेही अनासपुरे यांनी नमूद केले.
मराठवाडा, आणि कोकणात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय वसतिगृहातून केली आहे. आज शेकडो मुले इयत्ता १ ते १० पर्यंत शिक्षण घेत आहेत. त्यांच्या पुढील शिक्षणाचीही मोफत व्यवस्था लोकसहभागातून करण्यात येणार आहे. नाम फाऊंडेशनच्या कामाला विदर्भातही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून अनासपुरे म्हणाले, गावखेड्यातील राजकारण निवडणुकीपर्यंत मर्यादित रात नाही. मोठे नेते एकमेकांच्या गळ्यात गळा मिळवितात. तर लहान कार्यकर्ते राजकारण करून विकास कामांमध्ये बाधा आणतात.
देशात बाबा आणि बुवा खुप आहेत. त्यामुळे आपल्याला देवपण नको आहे. त्यासाठीच एकदा ज्या ठिकाणी काम झाले. तिथे आम्ही जावून सत्कारही स्वीकारत नाही. कामाची उभारणी झाल्यानंतर नागरिकांनी ते पुढे नेले पाहिजे, अशी नाम संघटनेची भूमिका आहे, याकडेही मकरंद अनासपुरे यांनी लक्ष वेधले.