घर बांधकामाला पुन्हा लागले ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:26 IST2021-03-08T04:26:24+5:302021-03-08T04:26:24+5:30
चंद्रपूर : मागील मार्च महिन्यामध्ये लागलेल्या लाॅकडाऊननंतर बांधकाम क्षेत्र पूर्णत: प्रभावित झाले होते. त्यानंतर शिथिलता मिळताच काही प्रमाणात बांधकाम ...

घर बांधकामाला पुन्हा लागले ब्रेक
चंद्रपूर : मागील मार्च महिन्यामध्ये लागलेल्या लाॅकडाऊननंतर बांधकाम क्षेत्र पूर्णत: प्रभावित झाले होते. त्यानंतर शिथिलता मिळताच काही प्रमाणात बांधकाम करणे सुरू झाले होते. अनेकांनी घरांचे बांधकाम सुरू केले . मागणी वाढल्यामुळे साहित्याचे दर वाढले. मात्र आता पुन्हा कोरोना संकटाचे सावट असल्यामुळे घर बांधकाम करणाऱ्या इच्छुक नागरिकांनी आपला प्लॅन बदलवित यावर्षी बांधकाला ब्रेक दिला आहे, तर काही नागरिकांनी अर्धवट बांधकाम पूर्ण करण्याचा निश्चय केला आहे.
लग्न पाहावे करून आणि घर पाहावे बांधून, या म्हणीप्रमाणे दिवसेंदिवस घर बांधणे सामान्य नागरिकांना अवघड होत आहे. कोरोना लाॅकडाऊननंतर तर बांधकाम साहित्याचे दर गगणाला भिडले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे घर बांधण्याचे स्वप्न हे केवळ स्वप्न ठरत आहे.
सामान्यत: दिवाळीनंतर घर बांधकाम करण्याचा नागरिकांचा कल असतो. मात्र मार्च २०२० मध्ये लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्वत्र ठप्प झाले. आता अर्धवट असलेले बांधकाम पूर्ण केल्या जात आहे. त्यातच लाॅकडाऊनमध्ये बहुतांश कंपन्या बंद असल्यामुळे आणि मागणीच्या तुलनेत साहित्याची आवक घटल्यामुळे बांधकाम साहित्याचे दर वाढले आहे. अद्यापही वाळू घाटांचे लिलाव झाले नाही. त्यामुळे लपून-छपून काहीजण वाळू पुरवित आहे. मात्र भाव अव्वाच्या सव्वा द्यावा लागत आहे. आता डिझेल तसेच पेट्रोलचे दर वाढल्यामुळे व्यावसायिकांनी प्रत्येक वस्तूंवर दर वाढविले आहे. त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.