महामार्गाचे बांधकाम ठरले शेतकऱ्यांना मारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 06:00 IST2020-01-06T06:00:00+5:302020-01-06T06:00:26+5:30
नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुका व चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव दुष्काळग्रस्त तालुका चिमूर व वरोरा या दोन तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ (ई) या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील वर्षभरापासून सुरू आहे. एस. एम.एस.प्रायव्हेट लिमिटेड व एस. आर.के. प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राट कंपन्याकडे या महामार्गाच्या चौपदरीकरण करण्याचे काम आहे.

महामार्गाचे बांधकाम ठरले शेतकऱ्यांना मारक
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : उमरेड- चिमूर- वरोरा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम मागील वर्षभरापासून सुरु आहे. कंत्राट कंपनीच्या दुर्लक्षामुळे या मार्गालगत असणाऱ्या शेती असणाºया शेतकºयांच्या शेतातील उभ्या पिकावर मोठया प्रमाणात वाहतुकीने धूळ बसत आहे. यात कापूस उत्पादकांची संख्या अधिक असून पांढरे सोने या धुळीने काळवंडत आहे. पावसाळ्याच्या काळात या महामार्गाच्या कामाने परिसरातील वहानगाव व बोथली शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याची ओरड ऐकायला मिळाली होती. सुरुवातीच्या काळापासून ढिसाळ नियोजनामुळे या महामार्गाचे काम शेतकऱ्यांना मारक ठरले आहे.
नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुका व चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव दुष्काळग्रस्त तालुका चिमूर व वरोरा या दोन तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ (ई) या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील वर्षभरापासून सुरू आहे. एस. एम.एस.प्रायव्हेट लिमिटेड व एस. आर.के. प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राट कंपन्याकडे या महामार्गाच्या चौपदरीकरण करण्याचे काम आहे. यापैकी चिमूर-वरोरा हा मार्ग संबधित कंत्राट कंपनीने पूर्णत: खोदला आहे. या मार्गाचे कासवगतीने चौपदरीकरण सुरु आहे. वाहतुकीकरिता या ठिकाणी पर्यायी मार्ग तयार करण्यात आला. या पर्यायी मार्गावरून मोठया प्रमाणात भरघाव वेगाने जडवाहनांची वाहतूक होत आहे. संबधित कंत्राट कंपनी या मार्गावर नाममात्र पाणी मारण्याचा देखावा करीत असून याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी या मार्गावरील उडणारी धूळ लगतच्या शेतातील पिकांवर बसत आहे. या मार्गालगतचे बहुतांश शेतकरी कापूस उत्पादक असल्याने ही धूळ शेतातील पांढऱ्या सोन्यावर बसत आहे. यामुळे शेतकऱ्यासाठी हा चिंतेचा विषय बनला आहे. पावसाळ्याच्या काळात खडसंगी परिसरातील वहानगाव व बोथली या गावातील महामागार्लागतच्या शेतकऱ्याच्या शेतात कंपनीच्या चुकीमुळे उभ्या पिकात मोठया प्रमाणात पाणी साचले होते. याचा फटका शेतकºयांना बसला असून त्यांचे पीक पूर्णत: नष्ट झाले. आता तर मार्गालगतच्या शेतकऱ्यांच्या उभ्या असलेल्या कापूस पिकावर मोठया प्रमाणात वाहतुकीने उडणारी धूळ बसत आहे. प्रत खराब झालेल्या कापसाला अपेक्षित भाव मिळणार नसल्याने शेतकरी संतापले आहेत.
नुकसान भरपाईची मागणी
कंत्राट कंपनीच्या दुर्लक्षाने महामार्गालगतच्या अनेक पिकावर धूळ बसली आहे. यामुळे अनेक शेतकºयांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून प्रसासनाने या नुकसानीचा तातडीने सर्व्ह करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
अपघाताचे सत्र सुरूच
मार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम मागील वर्षीपासून सुरू आहे. परिणामी या मार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्ता बांधकामासाठी गिट्टी व मुरूम ठिकठिकाणी टाकले असून मार्गावर सर्वत्र गिट्टी पसरली आहे. वाहन चालविताना संतुलन बिघडून अपघात होत आहेत. जागोजागी खोदकाम करून बांधकाम साहित्य अस्ताव्यस्त स्वरूपात टाकून ठेवले आहे.