पावसाची मुसळधार व रिपरिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 05:00 IST2020-10-08T05:00:00+5:302020-10-08T05:00:37+5:30

बुधवारी दिवसभर पावसाची सकाळपासून रिपरिप सुरू होती. या पावसाने सोयाबीन पिकाला चांगलाच फटका बसला आहे. सोयाबीन कापणीला झाल्यानंतर शेतकऱ्यांनी लगबगीने सोयाबीन पिकांची कापणी करून शेतात वाळण्यासाठी सोयाबीनचे लहान-लहान ढीग करून ठेवले आहे. परंतु अचानक पडलेल्या पावसाने कापणी करून ठेवलेले सोयाबीन पीक भिजल्याने जागेवरच खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Heavy rains and drizzle | पावसाची मुसळधार व रिपरिप

पावसाची मुसळधार व रिपरिप

ठळक मुद्देखरीप पिकांना जबर फटका : शेतकरी पुन्हा संकटात

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूरसह जिल्ह्यात सर्वत्र बुधवारी सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. पावसाची झड असावी, अशी पावसाची रिपरिप दिवसभर सुरू होती. या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील धान पीक अक्षरश: झोपून गेले. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन शेतातच कापून ठेवले होते. तेदेखील पावसात भिजून मोठे नुकसान झाले आहे.
चंद्रपुरात बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. प्रारंभी तासभर मुसळधार स्वरुपाचा पाऊस बरसला. त्यानंतर पावसाचा वेग काहिसा कमी झाला.मात्र पावसाची रिपरिप रात्रीपर्यंत सुरूच होती. पावसाळा गेला असे समजून अडगळीत टाकलेल्या छत्र्या, रेनकोट नागरिकांना पुन्हा बाहेर काढावे लागले. चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्वच भागात हा परतीचा पाऊस बरसला.

कापून ठेवलेले सोयाबीन पावसात भिजले
बुधवारी दिवसभर पावसाची सकाळपासून रिपरिप सुरू होती. या पावसाने सोयाबीन पिकाला चांगलाच फटका बसला आहे. सोयाबीन कापणीला झाल्यानंतर शेतकऱ्यांनी लगबगीने सोयाबीन पिकांची कापणी करून शेतात वाळण्यासाठी सोयाबीनचे लहान-लहान ढीग करून ठेवले आहे. परंतु अचानक पडलेल्या पावसाने कापणी करून ठेवलेले सोयाबीन पीक भिजल्याने जागेवरच खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. राजुरा तालुक्यात बहुतांश ठिकाणी बुधवारी पाऊस झाल्याने गोवरी, सास्ती, माथरा, चिंचोली, गोयेगाव, अंतरगाव, पोवनी, साखरी, वरोडा, मानोली, बाबापूर, कढोली(बू) परिसरातील खरिपातील सोयाबीन आणि कापूस पिकाला मोठा फटका बसला.

सोयाबीन,कापूस पीक उद्ध्वस्त
खरीप हंगामातील हाती येणारे सोयाबीन व कापूस पीक अशा अवेळी आलेल्या पावसामुळे शेतकºयांच्या डोळ्यादेखत उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अगदी सोयाबीन काढणीच्या सुरुवातीलाच सोयाबीन पिकांना पावसाचा फटका बसल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे.

धान पीक भुईसपाट
सिंदेवाही, मूल, नागभीड, चिमूर, ब्रह्मपुरी, पोंभूर्णा, बल्लारपूर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड करण्यात आली. हे पीक सध्या डोलात असतानाच बुधवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे हे पीक झोपून भुईसपाट झाले. त्यामुळे धानाचा दर्जा खालवण्याचा धोका निर्माण झाला आहे.

थंडीची चाहुल
आॅक्टोबर महिना सुरू झाला आहे. एरवी ऑक्टोबर महिन्यात गुलाबी थंडी पडू लागते. मात्र यावेळी ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा लोटायला आला तरी वातावरणात गरमी व उकाडा होता. मात्र बुधवारी आलेल्या पावसामुळे अचानक थंडीचीही चाहुल लागली. बुधवारी सायंकाळी थंडे वारे अंगाला झोंबू लागले होते.

Web Title: Heavy rains and drizzle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.