शासनाचा घरकूल लाभार्थ्यांसाठी आखडता हात

By Admin | Updated: September 2, 2015 00:45 IST2015-09-02T00:45:31+5:302015-09-02T00:45:31+5:30

सर्वसामान्य दारिद्र्य रेषेखालील गरिबांना हक्काचा निवारा असावा. त्यांचे जीवनमान उंचवावे, ...

Handicap hand for the beneficiaries of the government | शासनाचा घरकूल लाभार्थ्यांसाठी आखडता हात

शासनाचा घरकूल लाभार्थ्यांसाठी आखडता हात

जिल्हाभरात ११९६ उद्दिष्ट : बल्लारपूर तालुक्याला सर्वात कमी वाटा
अनेकश्वर मेश्राम  बल्लारपूर
सर्वसामान्य दारिद्र्य रेषेखालील गरिबांना हक्काचा निवारा असावा. त्यांचे जीवनमान उंचवावे, उघड्यावर संसार येऊ नये, यासाठी इंदिरा आवास योजना कार्यान्वित करण्यात आली, या योजनेची अंमलबजावणी जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा करते. या यंत्रणेने जिल्हाभरात १५ तालुक्यांमध्ये एकूण ३०८ ग्रामपंचायतीत केवळ एक हजार १९६ घरकुलाचे सन २०१५-१६ मध्ये उद्दिष्ट दिले आहे. यात नागभीड, सावली, ब्रह्मपुरी, वरोरा व चिमूर तालुक्यासाठी तीन अंकी आकड्यात तर बल्लारपूर तालुक्यात सात ग्रामपंचायतीला केवळ ३० लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी मंजुरी दिली. यावरुन शासनाने घरकुल लाभार्थ्यांसाठी आखडता हात घेतल्याने तीव्र नाराजी दिसून येत आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने आठ वर्षांपूर्वी दारिद्र्य रेषेखालील कच्चे घर असणाऱ्यांची प्रतीक्षा यादी तयार केली. त्यानुसार इतर मागास प्रवर्गातील गरिबांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी पंचायत समितीस्तरावरुन सर्वेक्षण करण्याचा आदेश निर्गमीत केला. जिल्हा पातळीवरुन सन २०१५-१६ चे उद्दिष्ट देण्यात आले. यासाठी जिल्ह्यातील ८४७ ग्रामपंचायतींपैकी केवळ ३०८ ग्रामपंचायतींचा समावेश या वर्षात करण्यात आला. यातील केवळ एक हजार १९६ लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ देताना व लाभार्थ्यांची निवड करताना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या गलथानपणामुळे ‘तोंड पाहून घरकुल देता काय?’ म्हणून लाभार्थ्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागत आहे.
दारिद्र्य रेषेखालील कच्चे घर असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) कुटुंबाच्या प्रतीक्षा यादीनुसार सावली तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीत १५२ लाभार्थी, नागभीड मध्ये ४४ ग्रामपंचायतीच्या १५२, ब्रह्मपुरी तालुक्यात ३८ ग्रामपंचायतींमध्ये १३४, वरोरा तालुक्यात २८ ग्रामपंचायतीत ११९ तर चिमूर तालुक्यात २४ ग्रामपंचायतीमध्ये १०४ लाभार्थ्यांना इंदिरा आवास योजनेतून घरकूल देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. चंद्रपूर तालुक्यात दोन ग्रामपंचायतसाठी ४२, जिवती तालुक्यात २१ ग्रामपंचायतीत ४८, कोरपना तालुक्यात १४ ग्रामपंचायतीसाठी ४४, राजुरा तालुक्यात २१ ग्रामपंचायतीसाठी ३९, पोंंभुर्णा तालुक्यात ११ ग्रामपंचायतीमध्ये ४३, गोंडपिपरी तालुक्यात २७ ग्रामपंचायतीमध्ये ८२, मूल तालुक्यात २३ ग्रामपंचायतमध्ये ८९, सिंदेवाही तालुक्यात ११ ग्रामपंचायतीत ७५, भद्रावती तालुक्यात ९ ग्रामपंचायतीसाठी ४३ तर बल्लारपूर तालुक्यातील सात ग्रामपंचायतीसाठी केवळ ३० लाभार्थी असे एकूण १ हजार १९६ लाभार्थ्यांना इंदिरा आवास योजनेच्या घरकुलाचा लाभ मिळणार आहे.
घरकुूल योजनेतील लाभार्थ्यांना बांधकाम सर्व उद्दिने पूर्ण करण्यासाठी एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते. घरकुलाला मंजुरी आदेशासोबत लाभार्थ्याला अग्रीम म्हणून ३७ हजार रुपयांचा धनादेश दिला जातो. दुसऱ्या टप्प्यात छतापर्यंत घराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर ३७ हजार रुपये तर अंतिम चरणात घरकुलाचे शौचालयासह बांधकाम पूर्ण करुन वास्तव्यासाठी जाण्यास उपयुक्त झाल्यावर २६ हजार रुपयांचा धनादेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे प्रत्येकांना घरकुलाचा लाभ मिळणे क्रमप्राप्त असताना आजतागायत इंदिरा आवास योजनेची उद्दिष्ट्यपूर्ती करण्यास शासन स्तरावरुन आखडता हात घेण्याचे धोरण अवलंबिण्यात आले. परिणामी प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांत अंसतोष आहे.

बल्लारपुरात सात गावासाठी केवळ ३० लाभार्थी
बल्लारपूर तालुक्यात एकूण १७ ग्रामपंचायती आहेत. इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) प्रतीक्षा यादीतील इंदिरा आवास योजनेतील विसापूर, इटोली, बामणी (दुधोली) दहेली, मानोरा, कळमना व कवडजई येथे शिल्लक लाभार्थी दर्शविण्यात आले आहे. सन २०१५-१६ च्या प्रशासकीय मान्यता घरकुल लाभार्थ्यांच्या वाट्याला केवळ ३० लाभार्थी आले. विसापूर येथे ओबीसीचे ११५ लाभार्थ्यांपैकी केवळ सहा घरकुलधारकांना लाभ देण्याचे ठरविण्यात आले. इटोली, बामणी दुधोली, दहेली, मानोरा, कवडजई व कळमना येथे प्रत्येकी चार लाभार्थी इंदिरा आवास योजनेतील घरकुलाचा लाभ घेण्यासाठी निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली, यामुळे अन्य प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे.

इंदिरा आवास योजनेतील प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांची पात्र संख्या मोठी आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत पंचायत समितीला उद्दिष्ट दिले जाते. त्यानुसार इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी तालुक्यात ३० लाभार्थ्यांचे प्रस्ताव मागण्यात आले. सात ग्रामपंचायतीमधील लाभार्थी निवड प्रक्रिया सुरु असून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे घरकुल लाभार्थ्यांचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
- बी.बी. गजभे
संवर्ग विकास अधिकारी, बल्लारपूर

Web Title: Handicap hand for the beneficiaries of the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.