लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : सोयाबीन पिकाने चालू हंगामात दगा दिला, कापसाचे बाजारभाव घसरले आणि आता चनाही अपेक्षित दर देत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. चना पीक हातात आले असतानाच बाजारात केवळ सुमारे ४ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे, तर शासनाने ५ हजार ८५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, हमीभाव खरेदीसाठी आवश्यक नोंदणीचा मुहूर्त अद्याप जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
दोन दिवसांपूर्वी अकाली पावसामुळे चना, गहू, तूर आणि मिरची पिकांचे नुकसान झाले. पावसाळी वातावरणामुळे अनेक शेतकऱ्यांनी घाईघाईने चना काढणी करून तो घरात साठवला आहे. परंतु चना दीर्घकाळ घरात ठेवल्यास त्याची प्रतवारी खालावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यावर्षी सुमारे २२ हजार ४२८ हेक्टर क्षेत्रावर चनाची पेरणी करण्यात आली आहे. हमीभाव जाहीर झाला असला तरी नोंदणी प्रक्रिया सुरू न झाल्याने खरेदीला विलंब होत आहे. नोंदणीस अनेक दिवस लागतात आणि त्यानंतरच प्रत्यक्ष खरेदी सुरू होते. मागील वर्षी बारदाना तुटवड्यामुळे हमीभाव खरेदी केंद्रे वारंवार बंद ठेवावी लागल्याचा अनुभव असल्याने शेतकरी साशंक आहेत.
अवकाळीमुळे नुकसान
वरोरा तालुक्यातील काही गावांमध्ये अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केली जात आहे.
"चना पीक निघाले असून बाजारभाव कमी आहे. चना जास्त दिवस घरात ठेवल्यास त्याची प्रतवारी खराब होते. त्यामुळे हमीभाव नोंदणी तातडीने सुरू करावी."- राजेंद्र चिकटे, माजी सभापती तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, वरोरा
Web Summary : Chickpea farmers face losses due to low market prices. While MSP is announced, delayed registration worries farmers about crop quality deterioration and potential losses from unseasonal rains.
Web Summary : चने के किसानों को कम बाजार मूल्य के कारण नुकसान का सामना करना पड़ रहा है। समर्थन मूल्य घोषित होने के बावजूद, विलंबित पंजीकरण से किसानों को फसल की गुणवत्ता में गिरावट और बेमौसम बारिश से होने वाले नुकसान की चिंता है।