वनविभागाचे मिश्र रोपवन आगीत जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:22 IST2021-02-20T05:22:27+5:302021-02-20T05:22:27+5:30
चिमूर : तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बोळधा येथील वनविभागाचे कक्ष क्रमांक ४२४ मध्ये मिश्र रोपवणाला आग लागून २० ...

वनविभागाचे मिश्र रोपवन आगीत जळून खाक
चिमूर : तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बोळधा येथील वनविभागाचे कक्ष क्रमांक ४२४ मध्ये मिश्र रोपवणाला आग लागून २० हेक्टरमधीन २२ हजार रोपे जळल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. हे रोपवन शिवनपायली गावाला लागून आहे. रोपवणाला लागून शेती आहे. आग शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचली, परंतु शेतकऱ्याचे नुकसान झाले नाही. मंगळवारी घडलेली ही घटना गुरुवारी उघडकीस आली.
ब्रम्हपुरी वन विभागांतर्गत वनपरिक्षेत्र तळोधी (प्रादेशिक), उपक्षेत्र, नेरी निमक्षेत्र बोळधा येथील कक्ष क्र ४२४ येथे २०१९ मध्ये राज्य शासनाच्या योजनेंतर्गत वनीकरण भरगच्च कार्यक्रम राबविण्यात येऊन मिश्र रोपवन पावसाळ्यात २० हेक्टर जागेमध्ये लावण्यात आले. दोन रोपांचे अंतर तीन बाय तीन मीटर एवढे होते. या रोपवणात विविध प्रजातीचे २२ हजार रोपे लावण्यात आले होते.
१६ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता लागलेल्या आगीमध्ये वाऱ्याच्या झुळकीने संपूर्ण रोपवन आगीच्या कवेत आले. संपुर्ण रोपवन आगीत जाळून खाक झाले. तसेच या रोपवणात असलेले तत्सम प्रकारची अनेक झाडे आणि वनस्पतीं जळून नष्ट झाली.
या रोपवणाच्या देखभालीसाठी वनविभागाचे रोजनदारी मजूर आहेत. हे मजूर रोपवणाच्या सर्व सीमेवर कचरा काढून जाळत असताना अचानक आलेल्या वाऱ्याने ही आग लागली, असा अंदाज आहे. वन विभागाने चौकशी करून सबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी शिवनपायली आणि परिसरातील गावकऱ्यांनी केली आहे