शेतकरी कर्जमुक्तीसाठी चिमुरात काँग्रेसची एसडीओ कार्यालयावर धडक
By Admin | Updated: June 7, 2017 00:39 IST2017-06-07T00:39:16+5:302017-06-07T00:39:16+5:30
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी, याकरिता राज्यातील शेतकऱ्यांनी भाजप सरकारविरुद्ध संप पुकारला आहे.

शेतकरी कर्जमुक्तीसाठी चिमुरात काँग्रेसची एसडीओ कार्यालयावर धडक
मागण्यांचे निवेदन : शेतमालाला हमीभाव द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर: शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी, याकरिता राज्यातील शेतकऱ्यांनी भाजप सरकारविरुद्ध संप पुकारला आहे. या शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शवित चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात उपविभागीय कचेरीवर धडक दिली.
शेतकरी शासनाच्या उदासीन धोरणामुळे व सततच्या नापिकीने आनखीचन कर्जाच्या खाईत जात आहे. त्याकरिता त्यांनी कर्जमुक्तीची मागणी केली आहे. राज्यातील संपाची धग मंगळवारला चिमूर क्रांती नगरीत पोहचली. सकाळी ११ वाजता नेहरु चौकातून शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा काँग्रेस सरचिटणीस व जि.प. सदस्य गजानन बुटके यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरले.
उपस्थित मोर्चेकऱ्यांना जि.प. सदस्य गजानन बुटले, राजू देवतळे, उपसभापती शांताराम सेलवटकर, संजय घुटके, राजू लोणारे, विजय डाबरे आदींनी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे कृषी पंपाची वीजबील माफ करुन मोफत वीजपुरवठा झाला पाहिजे आदीसह अनेक मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांना देण्यात आले.
यावेळी शिष्टमंडळामध्ये जि.प. सदस्य गजानन बुटके, संजय घुटके, रत्नाकर विटाळे, शांताराम शेलवटकर, गीता कारमेंघे, रत्नमाला सोनुले, सुधीर जुमडे, पप्पू शेख, विजय डाबरे, विनोद ढाकुणकर, कादीर शेख, सुधीर पंदीलवार, मनिष नंदेश्वर, राजू हिंगणकर, बाळू बोभाटे आदी सहभागी होते.
आठवडी बाजार
बंद पाडणार
सरकारने चार दिवसात शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास तालुक्यातील भिसी, नेरी, शंकरपूर, जांभूळघाट व खडसंगी येथील आठवडी बाजार बंद पाडून आंदोलन तीव्र करण्याचे आवाहान जि.प. सदस्य गजानन बुटले यांनी केले.
पालेभाज्या रस्त्यावर
टाकून सरकारचा निषेध
सरकार शेतमामाला हमीभाव व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देत नसल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. या शेतकरीविरोधी सरकारचा निषेध करण्यासाठी चिमूरच्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर पालेभाज्या रस्त्यावर टाकून निषेध केला.