शेतकरी नवरा नको गं बाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:28 IST2021-03-17T04:28:32+5:302021-03-17T04:28:32+5:30
पूर्वी मुला-मुलींचे लग्न आई-वडिलांकडून ठरविण्यात येत होते. बऱ्याचदा मुला व मुलींचे विचारसुद्धा विचारात घेण्यात येत नव्हते. मात्र, आता परिस्थिती ...

शेतकरी नवरा नको गं बाई
पूर्वी मुला-मुलींचे लग्न आई-वडिलांकडून ठरविण्यात येत होते. बऱ्याचदा मुला व मुलींचे विचारसुद्धा विचारात घेण्यात येत नव्हते. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. बहुतेक मुले व मुली स्वत: आपल्या पसंतीच्या मुलांची तर मुले आपल्या पसंतीच्या मुलींची निवड करतात. आता ऑनलाईन संकेतस्थळावर अनेक लग्न जुळविणाऱ्या संस्था सुरू झाल्या आहे. त्यावर नोंदणी करुन अनेकजण आपला जोडीदार निवडत आहेत तर विवाह मेळाव्यातूनसुद्धा लग्न जुळत आहेत. मात्र, संकेतस्थळावर किंवा विवाह मेळाव्यात मुलींनी नोंदविलेल्या अपेक्षा बघितल्या तर त्यांना सरकारी नोकरदार मुलगा पाहिजे, तर शहरातील उच्चशिक्षित मुलींना परदेशातील मोठा पगार कमावणारा नवरा हवा आहे. काही मुलींना व्यावसायिक किंवा खासगी ठिकाणी नोकरीवर असलेल्या मुलालासुद्धा पसंती दर्शविली आहे. मात्र, अनेक मुलींनी चक्क शेतकरी मुलाला नाकारल्याचे दिसून येत आहे.त्यासोबतच मुलांनीसुद्धा रंग, रूपापेक्षा कमवत्या मुलीला अधिक पसंती देत असल्याची माहिती आहे.
बॉक्स
अटी मान्य असतील तरच बोला
दिवसेंदिवस मुलींच्या अपेक्षा वाढत आहे. मुलींना उच्चशिक्षित, शासकीय नोकरदार, दिसायला स्मार्ट, कुटुंबापासून विभक्त असणारा, निर्व्यसनी मुलगा अशी अपेक्षा मुलींकडून व्यक्त होत आहे तर शहरातील मुलींना परदेशात राहणारा, श्रीमंत व दिसायला, भारी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या मुलाला पसंती देत आहेत.
बॉक्स
सर्वाधिक मागणी डॉक्टर व इंजिनिअरला
मुलींकडून डॉक्टर व इंजिनिअर मुलाला अधिक पसंती दिली जात आहे. बीएससी, एमबीए, अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेण्याऱ्या मुलींना डॉक्टर व इंजिनिअर मुलगाच हवा आहे.
अधिकारी संवर्गातील मुलींना किंवा मुलांना त्याच क्षेत्रातील अधिकारी मुलगा लग्नासाठी हवा आहे. काही अधिकारी संवर्गातील मुलींकडून डॉक्टरांनासुद्धा पसंती दिली जात आहे.
शासकीय नोकरदारालासुद्धा मोठी मागणी आहे. शिक्षक, तलाठी, क्लार्क यांनासुद्धा पसंती देण्यात येत आहे. बहुतांश मुलींना मुलगा हवा आहे. परंतु, शेतकरी मुलगा नसावा, असे वधू-वर सूचक केंद्राकडे दिलेल्या बायोडाटावरून दिसून येत आहे.
कोट
मी स्वत: शेतकरी आहे. रान हिरवेगार दिसले तरी घरी पीक येईपर्यंत काहीच भरोसा नाही. उत्पन्न चांगले झाले तर भाव मिळत नाही. मीच माझ्या मुलाला शेतात येऊ देत नाही. त्यामुळे मुलीला एखाद्या शेतकऱ्याला देण्यासाठी विचारच करावा लागतो.
-विठोबा पिंपळकर, कोराडी, चंद्रपूर
-----
मुलीकडच्या मंडळीकडून पहिला प्रश्न मुलगा काय करतो, असा विचारला जातो. शेतकरी असल्याचे सांगताच चेहऱ्यावरील हावभावच बदलत असल्याचा अनुभव अनेकदा आला आहे. आम्ही पिढ्यान्-पिढ्या शेतीच करत आलो आहोत. कष्टाने आणि स्वाभिमानाने जगत आहोत.
- मारोती दुधकोर, चंद्रपूर
------
मुलींकडून शासकीय नोकरदारास पहिल्यांदा प्राधान्य देण्यात येत आहे. त्यानंतर व्यावसायिक, खासगी नोकरदारांना पसंती आहे. मोठ्या प्रमाणात शेती असली तरी मुलींची नकारघंटाच असते.
- मोरेश्र्वर खैरे, वधू वर सूचक केंद्र, चंद्रपूर
-------