पाणीपुरवठा विभागाकडून फ्लोराइडयुक्त गाव बेदखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:28 IST2021-03-17T04:28:47+5:302021-03-17T04:28:47+5:30
घनश्याम नवघडे नागभीड : पाणीपुरवठा विभागाने आलेवाही या फ्लोराइडयुक्त गावाला पाणीपुरवठा योजनेपासून बेदखल केले आहे. पाच वर्षांपूर्वी या गावासाठी ...

पाणीपुरवठा विभागाकडून फ्लोराइडयुक्त गाव बेदखल
घनश्याम नवघडे
नागभीड : पाणीपुरवठा विभागाने आलेवाही या फ्लोराइडयुक्त गावाला पाणीपुरवठा योजनेपासून बेदखल केले आहे. पाच वर्षांपूर्वी या गावासाठी पेयजल योजना प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, वरिष्ठ पातळीवर ती मंजुरीविना पडून आहे.
आलेवाही हे नागभीड तालुक्यातील शेवटचे गाव असून, अतिशय दुर्गम भागात आहे. गावाची लोकसंख्या ५००च्या आसपास आहे. गावाभोवती घनदाट जंगल आहे. सतत फ्लोराइडयुक्त पाणी प्यायल्याने या गावातील लोकांना विविध आजार जडले आहेत. म्हणूनच शासनानेही या गावाची फ्लोराइडयुक्त गाव अशीच नोंद केली आहे.
फ्लोराइडयुक्त पाण्यापासून या गावाची कायम मुक्तता व्हावी, यासाठी ५ वर्षांपूर्वी या गावासाठी २५ लाख रुपये किमतीची जलस्वराज्य या योजनेतून पेयजल योजना प्रस्तावित करण्यात आली. मात्र, गाव फ्लोराइडयुक्त असूनही या पाच वर्षांत पेयजल योजनेला मंजुरीच देण्यात आली नाही. गावची ग्रामपंचायत व सिंदेवाहीचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग दरवर्षी वरिष्ठ पातळीवर या योजनेचा पाठपुरावा करीत असले आणि गावही फ्लोराइडयुक्त असले, तरी आलेवाहीच्या या पेयजल योजनेस आजवर मंजुरी का मिळत नाही, हे एक कोडेच. प्रत्येकाला शुद्ध पाणी हे शासनाचे धोरण आहे. त्यातल्या त्यात फ्लोराइडयुक्त गावास प्राधान्य द्यावे, असा नियम आहे. मग आलेवाहीच्या पेयजल योजनेचे घोडे अडते कोठे, असा सवाल गावकरी करीत आहेत. दरम्यान जलस्वराज्य योजनेतून मंजुरी मिळत नसल्याने, सुधारित अंदाजपत्रक तयार करून राष्ट्रीय पेयजल योजनेतून योजना प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, लोकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी आलेवाही येथे एका हातपंपावर शुद्ध पाण्यासाठी आरो लावण्यात आला आहे. मात्र, हा आरो पुरेसा पाणी देण्यास असमर्थ आहे. अनेकदा तो बंद अवस्थेतच राहत असल्याची माहिती आहे. सद्यस्थितीत तो बंदच आहे. दरम्यान, आलेवाहीचे ग्रामसेवक के.यू. वानखेडे यांना या संदर्भात विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, सव्वा वर्षांपासून मी आलेवाहीचा ग्रामसेवक म्हणून काम पाहत आहे. तेव्हापासून पाणीपुरवठा योजनेसंदर्भात माझा पाठपुरावा सुरू आहे, पण अजूनही योजनेला मंजुरी मिळाली नाही.