४२७ गावांत एक गाव एक गणपतीची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 06:00 AM2019-09-04T06:00:00+5:302019-09-04T06:00:28+5:30
गावामध्ये शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली. मात्र गावांमध्ये विविध मंडळाद्धारे गणेश मुर्तीची स्थापना करण्यात येत होती. त्यामुळे आपले मंडळ गावातील इतर मंडळापेक्षा वरचढ ठरावे या समजूतीने गावातील गणेश मंडळांमध्ये चढाओढ असायची.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गाव पातळीवर दाखल होणारे तंटे सोडविण्याच्या दृष्टीने तंटामुक्त समित्या स्थापना करण्यात आल्या. याच समितीने पुढाकार घेत एक गाव एक गणपतीची सुरुवात केली. गणपती उत्सवात गावात शांतता राहावी यासाठी तंटामुक्त समितीच्या वतीने जिल्ह्यातील ४२७ गावांत एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली. जिल्ह्याभरात एक हजार १५७ सार्वजनिक गणेशाची तर १२ हजार ४०० च्या जवळपास घरगीती गणपतीची स्थापना करण्यात आली आहे.
गावामध्ये शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली. मात्र गावांमध्ये विविध मंडळाद्धारे गणेश मुर्तीची स्थापना करण्यात येत होती. त्यामुळे आपले मंडळ गावातील इतर मंडळापेक्षा वरचढ ठरावे या समजूतीने गावातील गणेश मंडळांमध्ये चढाओढ असायची. अनेकवेळा गावांमध्ये वादसुद्धा होत होते. दरम्यान, सन २००७ ला गाव विकासाच्या प्रक्रियेत अडसर ठरलेले तंटे सोडवून विकासाचा मार्ग सुकर करण्यासाठी सरकारने तंटामुक्त समितीची स्थापना केली. त्यानंतर एक गाव एक गणपतीची संकल्पना सुरु केली. त्यानुसार यावर्षी ४२७ गावांत एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे.
चंद्रपूर
मनपातर्फे २२ कृत्रिम तलाव
श्रीगणेश मूर्तीच्या विसर्जनामुळे शहरातील तलावांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी २२ कृत्रिम तलाव आणि १५ निर्माल्य कलश निर्माण करण्यात आले आहेत. दाताळा रोड (पुलाजवळ), संजय गांधी मार्के, पं. दीनदयाल उपाध्याय तुकूम प्राथमिक शाळा, एस.टी. वर्कशॉप चौक, विठ्ठल मंदिरामागे, नेताजी चौक, बंगाली कॅम्प झोन आॅफीस जवळ इत्यादी ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहेत. या ठिकाणी वैद्यकीय पथ, अग्निशनम दल, वीज व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
चंद्रपूर शहरात २४३ गणेश मंडळ
चंद्रपूर शहरात २४३ च्या जवळपास गणेश मंडळाची स्थापना झाली आहे. घुग्घूस शहरात २५, ग्रामीण २४, पडोली शहरी सहा आणि ग्रामीण मध्ये २० सार्वजनिक गणेश मंडळांनी स्थापना करण्यात आली आहे.
पुरस्कारातून जनजागृती
गणपती उत्सवादरम्यान गावात शांतता राहावी, यासाठी एक गाव, एक गणपती ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या संकल्पनेमध्ये गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने पुढाकार घ्यावा, यासाठी मागील सरकारने पुरस्कारसुद्धा सुरु केले होते. त्यानंतर एक गाव एक गणपती या संकल्पनेत अनेक गावांनी सहभाग घेतला.