मूल नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेत त्रुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:29 IST2021-03-16T04:29:09+5:302021-03-16T04:29:09+5:30
मूल : मूल शहराला २४ तास पाणीपुरवठा करणारी योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानामधून टंचाईग्रस्त क्षेत्रातून मंजूर झाली आहे. ...

मूल नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेत त्रुटी
मूल : मूल शहराला २४ तास पाणीपुरवठा करणारी योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानामधून टंचाईग्रस्त क्षेत्रातून मंजूर झाली आहे. सदर योजना पूर्णत्वास आली आहे. सदर योजनेचे कंत्राट मे. लक्ष्मी सिव्हिल इंजि. कंपनी कोल्हापूर यांना देण्यात आले आहे. २८ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या योजनेचा अधिकारी व पदाधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे बट्ट्याबोळ झाला आहे. सदर योजनेचा संपूर्ण निधी खर्च करूनही योजनेत त्रुटी दिसत आहेत, त्या दुरुस्त कराव्यात, अशी मागणी मूल तालुका शिवसेना तालुका प्रमुख नितीन येरोजवार यांनी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांना निवेदनाव्दारे केली आहे.
मूल शहरातील जनतेला शुद्ध व मुबलक पाणी मिळावे, यासाठी २८ कोटी रुपये खर्च करुन पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आली. सदर योजना पूर्ण झाल्याचा बनाव करण्यात आला आहे. मात्र योजना पूर्ण झाली तेव्हापासून मूल नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा योग्य पद्धतीने होत नसल्याची जनतेची ओरड सुरू आहे. नळ जोडणी देताना कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले सिमेंट रस्ते तोडण्यात आले. त्यामुळे रस्ते कमकुवत झाले आहेत. २८ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेची चौकशी करण्याची मागणीही नितीन येरोजवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर मूल यांच्यामार्फत केली आहे. याप्रसंगी उपतालुका प्रमुख सत्यनारायण अमरूदिवार, मधुकर पवार, कपिल येलगेलवार, संदीप निकुरे, राहुल महाजनवार, निखिल भोयर, अरविंद करपे, आशिष गुंडोजवार, श्रीनिवास कन्नुरवार व शिवसैनिक हजर होते.