स्वखर्चातून नहराचा उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 22:48 IST2018-09-21T22:47:43+5:302018-09-21T22:48:21+5:30
शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या घोडाझरी तलावाच्या कालव्यांची दुर्दशा झालेली असून सिंचन विभाग व लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षितपणामुळे या कान्हाळगाव परिसरातील शेतकरी-शेतमजुरांनी स्वखर्चाने जेसीबी लावून नहाराचा उपसा केला.

स्वखर्चातून नहराचा उपसा
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोधी (बा.) : शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या घोडाझरी तलावाच्या कालव्यांची दुर्दशा झालेली असून सिंचन विभाग व लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षितपणामुळे या कान्हाळगाव परिसरातील शेतकरी-शेतमजुरांनी स्वखर्चाने जेसीबी लावून नहाराचा उपसा केला.
घोडाझरी तलावाअंतर्गत येत असलेल्या सावरगाव, कन्हाळगाव वितरिकेच्या नहराचा सिंचन विभागाने उपसा न केल्यामुळे जागोजागी कचरा व मुरूम व मातीचा थर जमा होत असल्यामुळे पाण्याचा प्रवाह वेगाने वाहत नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकरी अडचणीत आलेला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात धान लागवड केलेली असून गेल्या १५ दिवसांपासून पावसाने डोळे वटारल्यामुळे अनेकांचे धान-पीक सुकू लागलेले आहे. तसेच घोडाझरी तलावात पाण्याचा भरपूर जलसाठा असतानासुध्दा सिंचन विभागाच्या अधिकाºयांनी अप्पर घोडाझरी तलावाचे पाणी उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे अनेकांच्या शेतात भेगा पडलेल्या असून धान पिके सुकत चालली आहे. एकीकडे शेतकरी पिकांना पाणी हवे म्हणून वाट्टेल ती कसरत करीत आहेत. तर दुसरीकडे पाणी असतानाही अधिकारी पाणी द्यायला तयार नाही. कन्हाळगाव परिसरतील शेतकºयांनी अखेर सिंचन विभागावर अवंलबून न राहता स्वत: स्वखर्चातून जेसीबी लावून नहराचा उपसा केला. यावेळी नागभीड पं. स.चे माजी उपसभापती रमेश बोरकर व माजी उपसरंपच रमेश घुग्घुसकार, जगन घुग्घुसकार व अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते.