कुत्र्यांच्या चाव्याने महिनाभरात दगावली १३ जनावरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:24 IST2021-03-07T04:24:30+5:302021-03-07T04:24:30+5:30
वढोली : तालुक्यातील करंजी गावात पिसाळलेल्या कुत्र्यांच्या चाव्याने महिनाभरात १३ जनावरे मृत्युमुखी पडली. यामुळे करंजीतील पशुधन संकटात सापडले असून, ...

कुत्र्यांच्या चाव्याने महिनाभरात दगावली १३ जनावरे
वढोली : तालुक्यातील करंजी गावात पिसाळलेल्या कुत्र्यांच्या चाव्याने महिनाभरात १३ जनावरे मृत्युमुखी पडली. यामुळे करंजीतील पशुधन संकटात सापडले असून, गावकरी हैराण आहेत. असे असताना पशुधन विभागाच्या असहकार धोरणामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. यातच करंजी ग्रामपंचायतीत १६ फेब्रुवारीच्या पहिल्याच मासिक सभेत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी गावातील कुत्र्यांना मारण्याचे फर्मान सोडले. मात्र, अजूनही गावात या गंभीर प्रकाराची दहशत कायम आहे. जनावरे दगावणे सुरूच असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आता पशुधनाची काळजी सतावत आहे. परिणामी, पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
उद्योगविरहित गोंडपिपरी तालुक्यात नागरिकांचा उदरनिर्वाह शेती, शेतमजुरीसह वेळेवर मिळेल त्या कामावर होतो. अशातच शेतीचा हंगाम आटोपल्यावर रोजगाराच्या शोधात इतरत्र भटकणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. यातच कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने, बाहेर गेलेले मंडळी लॉकडाऊनच्या धास्तीने परतू लागली आहे. कोरोनामुळे जनसामान्याचे हाल होत असल्याचे चित्र आहे. यातच गोंडपिपरी तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने पशुधनही मोठे आहे. असे असताना आता तालुक्यातील करंजी गावात या महिन्याभरात पिसाळलेल्या कुत्र्यांच्या चाव्याने १३ जनावरे दगावली. आधीच कोरोनाच्या सावटात विवंचनेत दिवस काढत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. अनेकांचे बैल मेल्याने येत्या हंगामाचीच वाट लागली आहे. लागलीच ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी चावा घेणाऱ्या कुत्र्यांना मारण्याचे फर्मान सोडत १२ कुत्र्यांना मारले. ही मोहीम सुरू आहे. मात्र, गावात अजूनही कुत्र्यांची दहशत कायम आहे. यामुळे गावातील आबालवृद्धही भयभीत आहेत.
कोट
करंजीतील हा प्रकार गंभीर आहे. ग्रामपंचायतीने यावर कडक पावले उचलावी. अशा परिस्थितीत पशुपालकांना फारसा वेळ मिळत नाही. त्यामुळे प्रसंगी तत्काळ औषधोपचार करून घ्यावा. उपचाराची रक्कम शेतकऱ्यांना मिळेल.
- सुनील उरकुडे, सभापती, कृषी व पशुसंवर्धन, जि.प.चंद्रपूर