वितरण व्यवस्थेत आधार जोडणीचे काम ९० टक्के पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 06:00 AM2020-03-16T06:00:00+5:302020-03-16T06:00:32+5:30
राज्यातील धान्याच्या वितरण व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल झाला असून पॉस मशिनमुळे वितरणामध्ये पारदर्शकता आलेली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये आधार जोडणीचे काम पूर्ण होत आहे. ग्राहकाला खाद्यपदार्थाच्या आवेष्टानावरील माहिती बाबतीत काही तक्रार असल्यास आमच्याकडे करावी. तसेच खाद्यपदार्थ अथवा औषधांच्या बाबतीतील तक्रारही न घाबरता नोंदवावी.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ग्राहकाला घटनेने मूलभूत अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या मूलभूत अधिकार आणि हक्काचे संवर्धन आणि संरक्षण करण्याचे महत्त्वाचे काम राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समिती करीत आहे. ग्राहकाने आपल्या मुलभुत हक्काप्रति नेहमी जागरुक राहावे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये आधार जोडणीचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, जिल्हा ग्राहक संरक्षणाचे सदस्य गिरीधरसिंह बैस, वामनराव नामपल्लीवार, सदाशिव सुकारे तथा धान्य सुरक्षा अधिकारी गिरीश सातकर, जिल्हा ग्राहक संरक्षणाचे सदस्य उपस्थित होते.
शासकीय कार्यालयीन अधिकारी नागरिकांना, अभ्यांगताना भेटत नाहीत. प्रश्न गांभीर्याने समजून घेत नाहीत. मराठी भाषेचा वापर होत नसून संवादात इंग्रजी शब्दाचा उच्चार करण्यात येऊ नये. अभ्यांगताकरिता राखून ठेवलेल्या भेटीचा कालावधी सूचना फलकावर ठळक पणे प्रदर्शित करावे, अशा मागणी यावेळी केली.
तक्रार केल्यास ७२ तासांत कार्यवाही
राज्यातील धान्याच्या वितरण व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल झाला असून पॉस मशिनमुळे वितरणामध्ये पारदर्शकता आलेली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये आधार जोडणीचे काम पूर्ण होत आहे. ग्राहकाला खाद्यपदार्थाच्या आवेष्टानावरील माहिती बाबतीत काही तक्रार असल्यास आमच्याकडे करावी. तसेच खाद्यपदार्थ अथवा औषधांच्या बाबतीतील तक्रारही न घाबरता नोंदवावी. ही तक्रार नोंदविल्यानंतर ७२ तासांच्या आत त्या तक्रारीवर कार्यवाही केल्या जात असल्याचे सांगून ते म्हणाले की चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास रोखले असता ग्राहकांनी तक्रार करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार त्यांनी यावेळी केले.
जनतेच्या भेटीसाठी वेळ राखून ठेवावा
१८ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णय अन्वये शासकीय कार्यालयात जनतेच्या भेटीसाठी दुपारी २.३० ते ३.३० ही वेळ राखून ठेवावी व उपविभाग स्तरावर सोमवार व शुक्रवार या दोन दिवशी दुपारी ३ ते ५ कालावधी, तालुका स्तरावर सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस दुपारी ३ ते ५ हा कालावधी अभ्यांगतासाठी राखून ठेवावा, असे ठरले आहे. त्याची अंमलबजावणी व्हावी. याशिवाय अभ्यांगतासाठी राखून ठेवालेल्या कालावधीत अधिकाऱ्यांनी शक्यतो दौरा, बैठक आयोजित करु नये, अशी मागणीही सदस्यांनी केली.