प्रशासन आणि उपोषणकर्त्यांमधील चर्चा फिसकटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:41 IST2021-02-05T07:41:48+5:302021-02-05T07:41:48+5:30
चंद्रपूर : लोककल्याण बहूद्देशीय शिक्षण संस्था, ब्रह्मपुरीद्वारा संचालित स्वामी विवेकानंद गतिमंद मुलांच्या शाळेला अनुदान नाही. त्यामुळे अनुदान द्या, ...

प्रशासन आणि उपोषणकर्त्यांमधील चर्चा फिसकटली
चंद्रपूर : लोककल्याण बहूद्देशीय शिक्षण संस्था, ब्रह्मपुरीद्वारा संचालित स्वामी विवेकानंद गतिमंद मुलांच्या शाळेला अनुदान नाही. त्यामुळे अनुदान द्या, नाही तर मुलांचे पुनर्वसन करा, या मागणीसाठी संस्था पदाधिकाऱ्यांनी चार दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे.
दरम्यान, गुरुवारी जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी, तसेच जिल्हा महिला बालविकास अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत चर्चा केली. मात्र, तोडगा निघाला नाही. त्यामुळे उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे. उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली आहे. शासनाने संस्थेला मान्यता दिली असून, विद्यार्थीही सुपूर्द केले आहेत. मात्र, अनुदान देत नसल्याने संस्था चालविणे कठीण झाले आहे. दरम्यान, मतिमंद विद्यार्थ्यांना नियमानुसार १८ वर्षे वयाचे झाल्यानंतर त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. मात्र, याकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने नाइलाजाने या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी संस्थेवर आली आहे.
उपोषणाच्या चौथ्या दिवशी जिल्हा महिला बालविकास अधिकारी टेटे, तसेच जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी पेंदाम यांनी भेट घेत समस्या जाणून घेतली. मात्र, शासन स्तरावरील विषय असल्यामुळे तोडगा निघाला नाही. सोबतच पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या स्वीय सहायकानेही उपोषणकर्त्यांची विचारपूस केली. मात्र, अद्यापपर्यंत कोणताही तोडगा निघाला नसल्याने उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार संस्थेचे पुरुषोत्तम चौधरी यांनी केला आहे. दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची आरोग्य तपासणी केली असता प्रकृती खालावल्याचे निदान केले आहे.