रामाळा तलावाचे खोलीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 06:00 IST2020-03-13T06:00:00+5:302020-03-13T06:00:44+5:30
दोन महिन्याच्या कालावधीत रामाळा तलावातील लिकेजेसमुळे पाण्याची पातळी खालावली. या तलावाचे खोलीकरण करण्यास व तलावातील गाळ काढण्यासाठी उद्योगांनी सामाजिकदायित्व निधीतून निधी उपलब्ध करून द्यावा. रामाळा तलावाच्या सौदर्यीकरणाचा प्रस्तावही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

रामाळा तलावाचे खोलीकरण करा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गोंडकालीन ऐतिहासिक रामाळा तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरणाची मागणी इको-प्रो ने जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
दोन महिन्याच्या कालावधीत रामाळा तलावातील लिकेजेसमुळे पाण्याची पातळी खालावली. या तलावाचे खोलीकरण करण्यास व तलावातील गाळ काढण्यासाठी उद्योगांनी सामाजिकदायित्व निधीतून निधी उपलब्ध करून द्यावा. रामाळा तलावाच्या सौदर्यीकरणाचा प्रस्तावही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. खनिज विकास निधीतून या प्रस्तावाला मंजुरी प्रदान करून हा प्रश्न तातडीने निकाली काढल्यास तलावाच्या विकासाला गती येईल. २००८ रोजी रामाळा तलावात इकॉर्निया वनस्पतीने थैमान मांडले होते. त्यावेळी इको-प्रो व अन्य संस्थांनी रामाळा तलाव स्वच्छता अभियान सुरू केले. या अभियानाला प्रशासनानेही मदत केली. नागरिकांनी श्रमदानातुन रामाळा तलावाची स्वच्छ केली. मात्र वेळ व निधीच्या कमतरतेमुळे खोलीकरणाचा प्रश्न सुटला नाही. यंदा तलावातील पाणी कमी होत आहे. जिल्हा प्रशासनाने निधीची तरतूद करून खोलीकरणाच्या कामाला सुरूवात केल्यास सामाजिक संस्थाही पुढे येऊ शकतात, असा आशावाद इको-प्रो चे बंडु धोतरे यांनी निवेदनातून व्यक्त केला आहे.
पश्चिम दिशेला उभारा संरक्षण भिंत
तलावानजीक राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तलावातील पाणी शुद्ध राहावे, यासाठी वॉटर ट्रिटमेंट प्लांट बसवावे, रेल्वे मालधक्कावरून रासायनिक खताची आवक-जावक सुरू असते. जमिनीवर पडणारे युरीया, सल्फेट सारखे खत पावसाच्या पाण्यासोबत वाहुन रामाळा तलावात येतात. पश्चिम दिशेला अतिक्रमण वाढले. त्यामुळे संरक्षण भिंत उभारण्याची मागणीही इको- प्रोने केली आहे.