वेकोलिने अधिग्रहीत केलेल्या जमिनीचा मोबदला देण्याची मागणी
By Admin | Updated: May 7, 2016 01:30 IST2016-05-07T01:30:01+5:302016-05-07T01:30:01+5:30
भटाळी खुल्या खाणीच्या विस्तारीत खाणीकरिता भटाळी, किटाळी, कवठी, तिरवंजा, पायली या गावातील शेतकऱ्यांची जमीन वेकोलिने अधिग्रहीत केली आहे.

वेकोलिने अधिग्रहीत केलेल्या जमिनीचा मोबदला देण्याची मागणी
भद्रावती : भटाळी खुल्या खाणीच्या विस्तारीत खाणीकरिता भटाळी, किटाळी, कवठी, तिरवंजा, पायली या गावातील शेतकऱ्यांची जमीन वेकोलिने अधिग्रहीत केली आहे. मात्र मोबदला देण्यास दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांत असंतोष पसरला आहे.
१३ मार्च रोजी भटाळी येथे जमिनीचे धनादेश शेतकऱ्यांना वाटपाचा कार्यक्रम केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, आ. नाना शामकुळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. त्यावेळी सर्व शेतकऱ्यांचे धनादेश व लाभार्थ्यांना नोकरी एक महिन्याचे आत देण्याचे आश्वासन दिले. मात्र अनेक दिवस लोटूनही सर्व शेतकऱ्यांना धनादेश वाटप झाले नाही. तसेच नोकरीसंबंधात कोणतीही कार्यवाही सुरु झालेली नाही.
शेतकरी व बळीराज संघटनेच्या माध्यमातून नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. त्यामुळे घाईगर्दीने वेकोलिने १३ मार्च रोजी धनादेश वाटपाचा कार्यक्रम घेतला. मात्र अनेकांना मोबदला मिळाला नाहे. या कार्यक्रमात अधिकाऱ्यांच्या संबंधातील व ज्यांनी आर्थिक व्यवहारातून संबंध जुळविले त्या शेतकऱ्यांना धनादेश देण्यात आले आहे. एका कुटुंबातील तीन ते चार धनादेश एकाच वेळी देण्यात आले. परंतु, गरीब व ज्यांचा कुणी वाली नाही, अशा शेतकऱ्यांचे धनादेश अध्यापही दिलेले नाही.
कार्यक्रमात रायकीय नेत्यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी पुढील व्यवहार केले. काही मुलामुलींचे लग्न जुळविले, शेत विकत घेण्याचा सौदा करणे इत्यादी कार्य केले. परंतु, आश्वासन खोटे ठरल्याने शेतकऱ्यांनी केलेला व्यवहार खोटा ठरत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे धनादेश कोणताही भेदभाव न करता तातडीने देण्यात यावे. शेतकऱ्यांचे धनादेश वाटपात भेदभावाप्रमाणे नोकरी देण्यात भेदभाव होऊ नये, ज्या लाभार्थ्याचे वय जास्त आहे, त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी बळीराजा आता जागा हो संघटनेने केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)