वनशास्त्र विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर समिती गठित करण्याचा निर्णय
By Admin | Updated: March 9, 2016 02:05 IST2016-03-09T02:05:18+5:302016-03-09T02:05:18+5:30
चंद्रपुरात मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या वनशास्त्र पदवीधर विद्यार्थ्यांच्या आमरण उपोषणाची दखल अखेर वनमंत्र्यांनी घेतली.

वनशास्त्र विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर समिती गठित करण्याचा निर्णय
मंत्रालयात बैठक : चंद्रपुरातील आंदोलनाची आमरण उपोषणानंतर दखल
चंद्रपूर : चंद्रपुरात मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या वनशास्त्र पदवीधर विद्यार्थ्यांच्या आमरण उपोषणाची दखल अखेर वनमंत्र्यांनी घेतली. या संदर्भात मंत्रालयात मंगळवारी बैठक पार पडली. त्यात या विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर अभ्यास समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मागील दोन महिन्यांपासून या विद्यार्थ्यांचे वनसंरक्षक कार्यालयापुढे आंदोलन सुरू आहे. मागण्यांची आणि आंदोलनाची दखल घेत नाही हे पाहून या विद्यार्थ्यांनी आंदोलन तीव्र केले. चार दिवसांपासून त्यांनी आमरण उपोषण सुरू केले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने या आंदोलनकर्त्यांचे प्रचंड हाल झाले होते. त्यांच्या निवासाची आणि भोजनाचीही अडचण निर्माण झाली होती. ‘लोकमत’ने गेल्या आठवड्यात याची दखल घेऊन वृत्त प्रकाशित केले होते. दरम्यान, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख यांनी ‘आत्मक्लेष’ या मथळ्याखाली एक मजकूर सोशल मिडियावरून पाठविला. तो व्हायरल होत वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांच्यापर्यंत पोहोचला. वनमंत्र्यांनी याची तातडीने दखल घेवून देशमुख यांना सोमवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान मोबाईलवरून संपर्क साधला. देशमुख यांनी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची गंभीरता वनमंत्र्यांना सांगितली. अखेर ना. मुनगंटीवार यांनी ८ मार्चला दुपारी २ वाजता मंत्रालयात तातडीची बैठक बोलविली. वनमंत्र्यांच्या दालनात झालेल्या या बैठकीला वन विभागाचे सचिव विकास खारगे उपस्थित होते. या बैठकीत वनमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार समिती गठीत करण्यात आली असून लवकरच ही समिती आपला अहवाल देणार आहे.
या विद्यार्थ्यांचे हाल लक्षात घेवून अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसेवी संघटना मदतीसाठी सरसावल्या होत्या. कॅटरर्सचे संचालक अमूल रामटेके यांनी रात्री वेळेवर स्वयंपाक करून मुलामुलींची जेवणाची व्यवस्था केली. अनेक व्यक्तींनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला.
रोटी बँकेचे चोरडिया व सातपुते यांच्या मदतीने जयश्री गावंडे यांनी त्यांच्या रात्रीच्या भोजनाची व्यवस्था केली. ग्रामीण पत्रकार संघानेही उपोषण मंडपाला भेट देऊन मदत दिली. (जिल्हा प्रतिनिधी)