दिवसाआड पाणी पुरवठा

By Admin | Updated: May 16, 2015 01:39 IST2015-05-16T01:39:48+5:302015-05-16T01:39:48+5:30

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वर्धा नदीची धार मागील काही दिवसांपासून आटल्याने वरोरा शहरवासियांना एक दिवसाआड नदीच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात ...

Daily water supply | दिवसाआड पाणी पुरवठा

दिवसाआड पाणी पुरवठा

वरोरा : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वर्धा नदीची धार मागील काही दिवसांपासून आटल्याने वरोरा शहरवासियांना एक दिवसाआड नदीच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्याने नागरिक पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. या जलसंकटामुळे ट्युबवेलच्या पाण्यावर वरोरा शहरातील नागरिकांना तहान भागावावी लागत आहे.
वरोरा शहरातील अनेक प्रभागात वर्धा नदीचे शुद्ध पाणी नागरिकांना पालिका प्रशासनाच्यावतीने पुरविण्यात येते, तर उर्वरित प्रभागात ट्युबवेलने पाणी तर रेल्वे लाईनच्या नागपूर- चंद्रपूर मार्गालगतच्या वरोरा नगरपरिषद हद्दीत येणाऱ्या वसाहतीमध्ये बोर्डा गावानजीकच्या विहिरीतून नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येतो. वरोरा शहरात वर्धा नदीच्या तुळाना गावालगतच्या घाटावरुन पाणी पुरवठा करण्यात येतो. मागील काही दिवसांपासून वर्धा नदीच्या पाण्याची धार आटली असल्याने पाणी पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कपात करुन नागरिकांना ट्युबवेलद्वारा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी ट्युबवेल व नदीचे पाणी उन्हाळ्याच्या दिवसात पोहचत नाही, अशा ठिकाणी शहरात टँकरद्वारा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. वरोरा नगर परिषदेने वर्धा जिल्ह्यातील धरणातील पाणी आरक्षित केले, त्या पाण्याची मागणी करण्यात आली आहे. परंतु अद्यापही धरणातून पाणी सोडले नाही. सध्या आठ दिवस पुरेल असा पाणी साठा नदीतील पाणी पुरवठा यंत्रणेजवळ उपलब्ध आहे. परंतु हा साठा या पेक्षाही कमी असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मे महिन्याचे उर्वरित दिवस व जून महिन्यातील पहिला आठवड्यापर्यंत वरोरा शहर वासीयांना नदीचे पाणी मिळविण्याकरीता भटकंती करावी लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
नदीतील डोह वरदान
वर्धा नदीतील पाण्याची धार पुर्णत: आटली आहे. वर्धा नदीमध्ये असलेल्या वरोरा नगरपरिषदेच्या यंत्राजवळ पाणी शिल्लक नाही. या यंत्रानजीकच्या एक ते दीड किमी अंतरावर वर्धा नदीच्या पात्रात असणाऱ्या डोहामधून पाण्याची धार काढून त्या यंत्रापर्यंत पोहचविण्याची कसरत मागील काही दिवसांपासून नगर परिषद प्रशासन करीत आहे. त्यामुळे वर्धा नदीच्या पात्रातील डोह सध्यातरी वरदान ठरत असल्याचे दिसून येत आहे.
पाण्याचे आरक्षण तरीपण पाणी नाही
वरोरा नगर परिषदेच्या वतीने वर्धा जिल्ह्यातील धरणातील पाणी काही महिन्यापूर्वी आरक्षित केले ते पाणी वर्धा नदीतून सोडण्यात यावे, अशी मागणी केली. परंतु अद्यापही पाणी धरणातून सोडण्यात आले नाही. वर्धा नदीवर अवलंबून असलेल्या पाणी पुरवठा योजनांसाठी धरणातून पाणी आरक्षित केले असेल तर आरक्षित करणाऱ्याच्या पत्राची वाट पाहून एकत्रित पाणी सोडले जाणार असल्याची माहिती आहे.

Web Title: Daily water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.