दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 06:00 IST2019-10-27T06:00:00+5:302019-10-27T06:00:35+5:30
दोन दिवसांपूर्वीपर्यंत विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती. अधिकारी, कर्मचारी वर्ग निवडणुकीच्या कामात व्यस्त होता. राजकीय कार्यकर्ते, पुढारी हेदेखील निवडणुकीतच व्यस्त होते. २४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. २५ ऑक्टोबरपासून दिवाळी उत्सवच प्रारंभ झाला. त्यामुळे अनेकांची दिवाळीची खरेदी शिल्लक होती.

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत उसळली गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील दोन दिवसांपासून चंद्रपुरातील बाजारपेठेत प्रचंड गर्दी उसळली आहे. शहरातील महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी हे प्रमुख मार्ग गजबजून गेले आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी चंद्रपूरकरांची लगबग सुरू झाली आहे. रस्त्यावर, बाजारपेठेत वाहनेच वाहने दिसत असून मागील दोन दिवसात दिवाळीच्या खरेदीत कोट्यवधींची उलाढाल झाली आहे.
दोन दिवसांपूर्वीपर्यंत विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती. अधिकारी, कर्मचारी वर्ग निवडणुकीच्या कामात व्यस्त होता. राजकीय कार्यकर्ते, पुढारी हेदेखील निवडणुकीतच व्यस्त होते. २४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. २५ ऑक्टोबरपासून दिवाळी उत्सवच प्रारंभ झाला. त्यामुळे अनेकांची दिवाळीची खरेदी शिल्लक होती. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून चंद्रपुरातील बाजारपेठा नागरिकांनी फुलून गेल्या आहे. गांधी चौक, गिरनार चौक, गोलबाजारातच पायदळ चालायलाही कसरत करावी लागत आहे.
वाहतूक कोंडीमुळे खरेदीदार वैतागले
चंद्रपूर शहर मोठे असले तरी येथील मुख्य बाजारपेठ महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्गालगतच आहे. त्यामुळे महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्ग हे मुख्य रस्ते समजले जातात. या मार्गावरून वाहने जातात आणि परतही येतात. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. आता दिवाळीनिमित्त या मार्गावर प्रचंड गर्दी उसळली आहे. सायंकाळच्या सुमारास तर ही वर्दळ आणखी वाढते. वाहनांचे आवागमन या मार्गावरून वाढले असले तरी त्या तुलनेत पार्किंग झोन उपलब्ध नाहीत. त्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठेत आलेले नागरिक वाट्टेल तिथे वाहने पार्क करीत आहे. यामुळे बाजारपेठेत मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत असून खरेदीदारच यामुळे वैतागले आहेत. वाहनांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे किमान जिथे वाहनांचा सर्वाधिक संपर्क येतो, त्या महात्मा गांधी व कस्तुरबा मार्गांना रुंद करणे गरजेचे आहे. येथील जटपुरा गेट वाहतूक कोंडीचे मुख्य कारण ठरत आहे. रस्त्यावरील वाहने वाढली की जटपुरा गेटवर वाहतुकीची कोंडी झालीच समजा. गोलबाजारात तर वाहन घेऊन जाणे अशक्य झाले आहे.