आसोलामेंढा तलावावर वाढली पर्यटकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:42 IST2019-08-09T00:41:36+5:302019-08-09T00:42:06+5:30
निसर्गदत्त वनराईने समृद्ध व सांडव्यावरून वाहणाऱ्या धबधब्यामुळे मागील आठवड्यापासून आसोलामेंढा तलावावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. १०० वर्षापूर्वी इंग्रजांनी बांधलेल्या आसोलामेंढा तलावाचे नैसर्गिक सौंदर्य मनाला मोहित करणारे आहे.

आसोलामेंढा तलावावर वाढली पर्यटकांची गर्दी
उदय गडकरी।
लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : निसर्गदत्त वनराईने समृद्ध व सांडव्यावरून वाहणाऱ्या धबधब्यामुळे मागील आठवड्यापासून आसोलामेंढा तलावावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे.
१०० वर्षापूर्वी इंग्रजांनी बांधलेल्या आसोलामेंढा तलावाचे नैसर्गिक सौंदर्य मनाला मोहित करणारे आहे. पावसाळ्यात सांडव्यावरुन वाहणारे पाणी पर्यटकांसाठी पर्वणीच ठरते. जिल्ह्याच्या कानाकोपºयातूनच नव्हे तर अन्य जिल्ह्यातूनही येणाºया पर्यटकांची गर्दी वाढत आहे. तलाव परिसरातील सौंदर्य आणि वाहणारे पाणी मनाला आल्हाद देतो. १०० वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी येथील नैसर्गिक सौंदर्याचे महत्त्व जाणले होते. परंतु, स्वतंत्र भारतातील शासनाने या परिसराकडे कायम दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. जलसाठा आणि क्षेत्रफळाने जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव म्हणून ओळखला जातो. तलावाची सिंचन क्षमताही मोठी आहे. गोसेखुर्द प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात येत असल्याने तलावातील जलसाठा निरंतर कायम राहतो. अशा परिस्थितीत या परिसराला पर्यटन स्थळाचा दर्जा देवून सुविधा उपलब्ध केल्यास आकर्षणाचे स्थळ म्हणून विकसित होऊ शकते. शासनाच्या कोणत्याही सुविधा नसताना पर्यटकांची दिवसेंदिवस वाढणारी गर्दी हे आसोलामेंढा तलावाच्या निसर्ग सौंदर्याचेच प्रतीक आहे. जिल्ह्यातील अधिकृत पर्यटन स्थळाच्या तुलनेत आसोलामेंढाचे सौंदर्य व वेगळेपणा नजरेत भरतो. तलावाच्या परिसराला विकसित करण्यासाठी शासनाने दूरदृष्टी दाखवून आणि पर्यटन स्थळाचा दर्जा दिल्यास रोजागराची संधी निर्माण होऊ शकतात. देश-विदेशतील पक्षांचे या तलावर होणारे स्थलांतरण अभ्यासाचा विषय आहे. परिसरातील हिरवीगार वनराई आणि त्यातील विविध प्रजाती, वन्यप्राणी हे सुद्धा पर्यटनाच्या दृष्टीने लाभदायक ठरू शकतात. जिल्ह्यातील एकाही तलावात चार प्रपातांची (सांडवे) निर्मिती करण्यात आली नाही. मात्र आसोलामेंढा तलावाच्या चार सांडव्यावरून वाहणारे पाणी पर्यटकांचे मन मोहीत करते. आसोलामेंढा तलावाच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी प्रशासनाने एक पाऊल पुढे येवून परिसराचा विकास करावा. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राची व्याप्ती वाढेल, असा आशावाद पर्यटकांनी व्यक्त केला आहे.
सिंचनाची व्याप्ती वाढू शकते
ब्रिटिश काळातील आसोलामेंढा तलावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. पर्यटन स्थळाचा दर्जा देत असताना तलावाला बाधा होणार नाही, या दृष्टीने विकास आराखडा तयार करावा. शेतकऱ्यांसाठी हा तलाव उपयुक्तच आहे. पण शासनाने लक्ष दिल्यास सिंचन व्याप्ती पुन्हा वाढेल.