वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 23:00 IST2018-09-22T22:59:36+5:302018-09-22T23:00:13+5:30

शुक्रवारी रात्री अचानक वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे नदीला लागून असलेल्या शेतात पाणी शिरले. यात सोयाबीन कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Crop damage due to the floods that flooded the Wardha river | वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे पिकांचे नुकसान

वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे पिकांचे नुकसान

ठळक मुद्देशेतातील जनावरांचा चाराही खराब : सोयाबीन व कापूस पीक पाण्याखाली

लोकमत न्यूज नेटवर्क
पिपरी (देशमुख) : शुक्रवारी रात्री अचानक वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे नदीला लागून असलेल्या शेतात पाणी शिरले. यात सोयाबीन कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
याशिवाय शेतात असलेला जनावरांचा चाराही उद्ध्वस्त झाला. दरम्यान, शनिवारीदेखील नदीचे पाणी वाढत असल्यामुळे कोच्ची-घोनाड मार्गावरील पुलावर पाणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अद्याप एकही मार्ग बंद झालेला नाही. मात्र पाणी असेच वाढत गेल्यास काही मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. अचानक आलेल्या पुरामुळे पिपरी देशमुख येथील पाणी पुरवठ्याची पाईपलाईन नदीच्या पात्रात बुडाली आहे. मोटारपंपही वाहून गेल्यामुळे ग्रामपंचयतीद्वारे गावात होणारा पाणी पुरवठा बंद झाला आहे. यात ग्रामपंचायतीचेही ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने पूरबुडित क्षेत्राचे सर्व्हेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सर्व शेतकºयांकडून केली जात आहे.
पुराचे पाणी गोठ्यात शिरल्याने शेळ्यांचा मृत्यू
वरोरा : नाल्याला पूर आला. या पुराचे पाणी नजिकच्या गोठ्यात शिरल्याने गोठ्यातील शेळ्या व कोंबड्यांचा मृत्यू झाला. यात संबंधित शेतकऱ्याला लाखो रूपयांचा फटका बसला आहे. सदर घटना वरोरा शहरानजिकच्या सुर्ला गावात शुक्रवारी घडली. वरोरा शहरानजिकच्या बोर्डा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सुर्ला गावाजवळ योगेश व रवींद्र देसाई या भावंडांचे शेत आहे. दोघेही शेतीला जोडधंदा म्हणून मागील काही वर्षांपासून शेतात गोठे बांधून शेळी पालन व कुक्कुट पालनाचा व्यवसाय करीत आहेत. शेताजवळच एक नाला वाहतो. गुरुवारी व शुक्रवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यात गोठ्या नजिकच्या नाल्याला पूर आला. पुराचे पाणी गोठ्यात शिरले. ही बाब देसाई कुटुंबीयांना माहित होताच त्यांनी गोठ्याकडे धाव घेतली. परंतु पुराचे पाणी अधिक असल्याने त्यांना गोठ्यापर्यंत जाता आले नाही. पुराच्या पाण्यात गोठा बुडाल्याने गोठ्यातील शेळ्या व कोंबड्यांचा जागीच मृत्यू झाला. यात देसाई कुटुबीयांना लाखो रूपयांचा फटका बसला आहे. शासनाने पंचनामा करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Crop damage due to the floods that flooded the Wardha river