वडकुली पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार
By Admin | Updated: August 30, 2014 23:34 IST2014-08-30T23:34:18+5:302014-08-30T23:34:18+5:30
पोंभुर्णा तालुक्याच्या सिमेवर असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील वडकुळी येथील भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेत सात लाखांचा भ्रष्टाचार झाला. सदर प्रकरणाची संबंधित विभागाकडून चौकशी करण्यात आली.

वडकुली पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार
देवाडा खुर्द : पोंभुर्णा तालुक्याच्या सिमेवर असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील वडकुळी येथील भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेत सात लाखांचा भ्रष्टाचार झाला. सदर प्रकरणाची संबंधित विभागाकडून चौकशी करण्यात आली. परंतु दोषिंवर अजूनपर्यंत कारवाई करण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
वडकुली या गाावात नेहमी होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी लोकवर्गणीच्या माध्यमातून गावात जिल्हा परिषद अंतर्गत २००८-०९ मध्ये भारत निर्माण पाणी पुरवठा योजना मंजूर केली. त्यानुसार याठिकाणी पाणी पुरवठा समितीची स्थापना करण्यात आली. सदर योजनेला जिल्हा परिषद पाणी पुरवठा योजनेंतर्गत दोन हप्त्याची २४ लाख रुपयाची रक्कमसुद्धा प्राप्त झाली. परंतु समितीचे अध्यक्ष व सचिवानी सदर रक्कमेचा कामावर परिपूर्ण वापर न करता कामात गैरप्रकार केल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येताच या प्रकरणाची माहिती ग्रामपंचायतीला विचारली. परंतु ग्रामपंचायतीने या प्रकरणाची माहिती आम्हच्याकडे उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांनी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांकडे माहिती अधिकारात माहिती मागितली. कार्यकारी अभियंत्याकडून मिळालेल्या माहितीमध्ये आतापर्यंत कामावर १६ लाख ३५ हजार ९२८ रुपयाचा खर्च झाला असून ७ लाख ४२ हजार ९१० रुपये समितीने जास्त उचल केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी संबंधित प्रकरणाची योग्य चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे १७ फेब्रुवारी २०१४ ला तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी सुध्दा करण्यात आली. मात्र अजुनपर्यंत दोषिंवर कारवाई करण्यात आली नाही.
शासन दरबारी ग्रामीण भागाच्या विकासासाठी नानाविध योजना व उपक्रम राबविले जातात. परंतु स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अनेक योजना रखडल्या आहेत.
समितीतील अध्यक्ष, सचिवावर कारवाई करून त्यांच्याकडून सदर रक्कम जमा करावी व रखडलेले काम पूर्ण करून गावकऱ्यांना पाण्याची सुविधा निर्माण करून देण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)