पालिकेने घेतला स्वच्छ व सुंदरतेचा ध्यास
By Admin | Updated: February 26, 2016 01:09 IST2016-02-26T01:09:21+5:302016-02-26T01:09:21+5:30
भद्रावती शहर हे पर्यटननगरी घोषित झाली. त्यामुळे शहरात देश-विदेशातून लाखो नागरिक तथा भाविक येत असतात.

पालिकेने घेतला स्वच्छ व सुंदरतेचा ध्यास
भद्रावतीकरांकडून सहकार्याची अपेक्षा : स्मार्ट सिटी करण्यासाठी धडपड
आयुधनिर्माणी : भद्रावती शहर हे पर्यटननगरी घोषित झाली. त्यामुळे शहरात देश-विदेशातून लाखो नागरिक तथा भाविक येत असतात. आपले शहर या पाहुण्यांनी स्वच्छ व सुंदर शहर म्हणून अनुभवावे. एक स्मार्ट सिटी म्हणून भद्रावतीची ओळख जगाच्या नकाशावर निर्माण व्हावी, यासाठी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांना स्वच्छ व सुंदर भद्रावतीचा ध्यास लागलेला आहे. त्यासाठी शहरवासीयांनी सहकार्य करुन सुंदर भद्रावतीच्या निर्मितीत आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
शहरातील नागरिकांना वीज, पाणी व रस्ते तथा भौगोलिक सुविधा पुरविणे हे नगरपालिकेचे काम आहे. पालिकेत राजकारणी मंडळी सत्ताधारी झाली की, आपली रुटीन कामे करीत असतात. भद्रावती पालिकाही याकामात कार्यरत आहे. परंतु या व्यतिरिक्त शहराच्या सुंदरतेचा ध्यास मनात बाळगून त्या दिशेने सक्रीय पाडले टाकणारे पालिका प्रशासन आपल्या आगळ्या-वेगळ्या कामाने शहरात कौतुकाचा विषय झालेले आहे.
स्वच्छ भद्रावती ठेवण्यासाठी पालिकेने स्वत: पुढाकार घेऊन प्रत्येक कुटुंबाला दोन कचराकुंड्या विनामूल्य पुरविण्याचा संकल्प केलेला आहे. या कचराकुंड्या प्रत्येकी दहा लिटर क्षमतेच्या असून दोन रंगांच्या आहेत. हिरव्या रंगाच्या कचरा कुंडीत ओला कचरा व लाल रंगाच्या कचरा कुंडीत सुका म्हणजे वाळलेला कचरा जमा करावयाचा आहे. सदर कचराकुंडीचे वाटप पालिकेतर्फे सुरू होणार असून मालमत्ताधारकांनी चालू वर्षाचा कर भरल्याची पावती दाखवून या कचराकुंडीला नि:शुल्क घरी नेता येणार आहे. आता पालिका प्रशासनानेच कचराकुंड्या वितरित केल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात सोय होणार असल्याने रस्त्यावर पडणारा कचरा कुंडीतच पडल्याने शहरातील सार्वत्रिक घाण कमी होण्यास मदत होणार आहे.
१ फेब्रुवारीपासून भद्रावती शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आलेली आहे. अशा प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वा कागदी पिशव्यांचा पर्याय पालिकेने पुढे आणला आहे. या उपरांत कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा विक्रीसाठी वापर होत असल्याचे लक्षात येताच, १५ दुकानदारांवर कारवाई करुन ५० किलो पिशव्या पालिकेने जप्त केल्या आहे. पालिका शहराच्या सुंदरतेकरिता प्लास्टिक निर्मूलनावर विशेष भर देणार आहे. तसा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठरावही मंजूर करुन घेतला आहे. प्लास्टिक पिशव्या वापर करणाऱ्यांवर पालिकेची वक्रदृष्टी असल्याचे शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वापर कमी होईल. परिणामत: इकडेतिकडे फेकल्यानंतर दिसणारे ओंगळवाणे प्लास्टिक दर्शन कमी होऊन शहराच्या सौंदर्यात भर पडेल, असा नागरिकांना विश्वास आहे. नगराध्यक्ष अनिल धानोरकर स्वत: शहराची सुंदरता गांभीर्याने घेऊन विविध सामाजिक संथा व कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवून असल्याची माहिती आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्यास भद्रावती शहर स्वच्छ व सुंदर शहर म्हणून नावारुपास येईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.(वार्ताहर)