जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST2020-04-17T05:00:00+5:302020-04-17T05:00:58+5:30

अन्नधान्याच्या सुविधा उपलब्ध करणे व शेतकऱ्यांना उपलब्ध परिस्थितीत नव्या हंगामासाठी सिद्ध करणे, अशी तिहेरी लढाई प्रशासन लढत आहे. याला जनतेचे उत्तम पाठबळ मिळत आहे. त्यामुळे शासन, प्रशासन व सामान्य जनता जिल्ह्यात एकजुटीने काम करीत असल्याने कोरोनाचा शिरकाव होणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीविजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी येथे केले.

Corona will not be spared in the district | जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होणार नाही

जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होणार नाही

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची ग्वाही : मात्र सर्वांनी एकजुटीने काम करा'

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ग्रामीण व शहरी भागात मोठया प्रमाणात वैद्यकीय तपासणी, जिल्हास्तरावर कोविड-१९ वैद्यकीय प्रयोग शाळेची उभारणी, वैद्यकीय यंत्रणेला आधुनिक सुविधा उपलब्ध करणे, ग्रामीण भागातील नागरिकांना अन्नधान्याच्या सुविधा उपलब्ध करणे व शेतकऱ्यांना उपलब्ध परिस्थितीत नव्या हंगामासाठी सिद्ध करणे, अशी तिहेरी लढाई प्रशासन लढत आहे. याला जनतेचे उत्तम पाठबळ मिळत आहे. त्यामुळे शासन, प्रशासन व सामान्य जनता जिल्ह्यात एकजुटीने काम करीत असल्याने कोरोनाचा शिरकाव होणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीविजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी येथे केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना संसर्ग संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते व वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत त्यांनी आढावा घेतला.
त्यानंतर नागरिकांना प्रशासनाच्या निर्देशाचे पुढील ३ मेपर्यंत पालन करण्याचे आदेश दिले. ३ मेपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी तथा साथरोग कायद्याअंतर्गत निर्बंध लागू राहतील. मात्र यामधून जीवनावश्यक सेवा व त्यासाठीची होणाºया वाहतुकींना सुरू ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बँकेऐवजी सेतू केंद्रातून काढा पैसे
जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील ३ तारखेपर्यंत जिल्ह्यात काय सुरू राहील व काय बंद राहील यासंदर्भात आदेश जारी केले आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तू तसेच शेतीची सर्व कामे सुरळीतरित्या सुरू राहतील, याकडे शासनाने लक्ष वेधले आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा येथील मजुरांना तेंदूपत्ता गोळा करण्याचे काम करण्यास मान्यता दिली आहे. बँकांनी याकाळात शेतकऱ्यांना पीक कर्ज नियमितपणे उपलब्ध करावे. तसेच संचारबंदी असताना गाव पातळीवर सेतू केंद्रातून नागरिकांना आवश्यक रक्कम योग्य प्रकारे वितरीत व्हावी, याकडे लक्ष देऊन असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सांगितले.'

कार्डधारकांना किराना साहित्याचे वाटप
प्रत्येक नागरिकाला सुरक्षित ठेवण्यासाठी शासन म्हणून आमचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणीही उपाशी राहू नये, यासाठी गरिबी रेषेखालील व अंत्योदय कार्डधारकांना खनिज विकास निधीतून किराना साहित्याचे वाटप करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. नागरिकांनीदेखील या परिस्थितीत स्थानिक स्तरावर सुरू करण्यात आलेल्या जिल्हाधिकारी मदत निधी व राज्य स्तरावरील मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मोठया प्रमाणात मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

नव्या ६५ पैकी ५० नमुने निगेटिव्ह
जिल्हयात गुरुवारी कोरोना संसर्ग संशयित म्हणून ७३ नागरिकांची नोंद करण्यात आली. ६५ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ५० नमुने निगेटिव्ह निघाले आहेत. १५ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे.

२,९४० संशयित निगराणीखाली
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या २८ हजार ७६ आहे. यापैकी दोन हजार ९४० नागरिक निगराणीखाली आहेत. तर १४ दिवसांच्या होम क्वारंटाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या २५ हजार १३६ आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये सध्या ५९ जण आहेत. जिल्ह्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह नसणे ही अतिशय सकारात्मक बाब आहे.

आयसोलेशनसाठी १२ हॉस्पिटल ताब्यात
जिल्ह्यात १२ हॉस्पिटल आयसोलेशनसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. १८ शासकीय इमारतीमध्ये जवळपास १२०० बेड उपलब्ध आहेत. उद्रेकाच्या कालावधीत करायच्या उपचाराचे प्रशिक्षण कर्मचाºयांना देण्यात आले असून जिल्ह्यातील यंत्रणा कोणत्याही प्रसंगाला सामना देण्यासाठी तत्पर आहे.

तीन महिने पुरेल एवढा धान्यसाठा
वैद्यकीय यंत्रणा बळकट करत असतानाच ग्रामीण व शहरी भागातील सर्व नागरिकांना आवश्यक अन्नधान्याचा पुरवठा व्हावा, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. पुढील तीन महिने पुरेल इतका मुबलक धान्य पुरवठा जिल्ह्यात आहे. याशिवाय महानगर पालिकेमार्फत कम्युनिटी किचन व जिल्ह्यात शिवभोजन व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने निराधार, निराश्रित लोकांना मदत केली जात आहे. शिवभोजन थाळीची संख्या दोन हजार ४०० गेली आहे. अन्य राज्यातील अडकलेल्या नागरिकांनादेखील योग्यप्रकारे निवारा व भोजन दिल्या जात आहे.

Web Title: Corona will not be spared in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.