मोहबाळा गावात दूषित पाणी
By Admin | Updated: May 25, 2014 23:25 IST2014-05-25T23:25:13+5:302014-05-25T23:25:13+5:30
तालुक्यातील मोहबाळा गावात गेल्या चार ते पाच दिवसांपासून नळाद्वारे दूषित पाणी पुरवठा होत आहे. आठ वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या टाकीत पाणी भरुन त्या दूषित पाण्याचा गावकर्यांना पुरवठा केला जात

मोहबाळा गावात दूषित पाणी
नागरिकांचे आरोग्य धोक्यात : सरपंच व ग्रामसेविकेने हात झटकले विनायक येसेकर - भद्रावती तालुक्यातील मोहबाळा गावात गेल्या चार ते पाच दिवसांपासून नळाद्वारे दूषित पाणी पुरवठा होत आहे. आठ वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या टाकीत पाणी भरुन त्या दूषित पाण्याचा गावकर्यांना पुरवठा केला जात असल्याची बाब लक्षात येताच गावात खळबळ उडाली आहे. दूषित पाणी पुरवठय़ाबाबत येथील नागरिकांनी येथील सरपंच व ग्रामसेवकाकडे तक्रार केली. मात्र या दोघांनीही आपल्याला काहीच माहित नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले. या वर्षी झालेल्या अतवृष्टीमुळे तालुक्यात समाधानकारक जलसाठा आहे. परिणामी तालुक्यात कुठेही फारशी पाणी टंचाई जाणवत नाही. परंतु तालुक्यातील मोहबाळा गावात मुबलक पाणी असतानासुद्धा दूषित पाणी पिण्याची गावकर्यांवर वेळ आली आहे. मोहबाळा गावात पूर्वी पाणी पुरवठा हा गावातील विहीरीतून होत असे. मात्र विहीर व हातपंपाचे पाणी दूषित असल्याने पंचायत समितीद्वारे आठ वर्षांपूर्वी गावात बोअर मारण्यात आला. पाण्यासाठी टाकी उभारण्यात आली. गावकर्यांना स्वतंत्र नळ देण्यात आले. मात्र टाकीद्वारे देण्यात आलेली ही नळयोजना एकच महिना सुरळीत सुरू होती. तत्कालिन सरपंच राजू मशारकर यांच्या कार्यकाळात एक महिना चाललेली नळयोजना वीज बिलाचा भरणा न केल्याने विद्युत पुरठा खंडीत करण्यात आल्याने नळयोजना बंद पडली. परिणामी नागरिकांची पाण्यासाठी पुन्हा भटकंती सुरु झाली. तब्बल आठ वर्षे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक भटकत होते. येथील सरपंच तानेबाई देऊळकर यांच्या कार्यकाळात विजेचे बील भरल्याने विद्युत पुरवठा पुन्हा सुरु करण्यात आला. त्यामुळे एक महिन्यापासून पंपाद्वारे सरळ पाणी पाणी पुरवठा करण्यात येत होता. नळयोजनेची पाण्याची टाकी आठ वर्षापासून बंद आहे. त्या टाकीवर चढण्यासाठी शिडी नाही. त्यावर झाकण नाही. त्यात पालीचे अंडे, किडे, झाडाचा पालापाचोळा, मृत उंदीर पडून आहेत. टाकीची सफाई न करता त्यातच पाणी साठविण्यात आले आहे. तेच दुर्गंधी युक्त पाणी गेल्या दोन-तीन दिवसांपासून या गावकर्यांना पुरविण्यात येत आहे. पाण्याला दुर्गंधी येत असल्याने काही नागरिकांना या बाबत चौकशी केली असता, स्वच्छ न केलेल्या टाकीतील पाणी पुरविले जात असल्याची बाब समोर आली. प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष मोहबाळा गावाला भेट देऊन गावकर्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गावात विहीर, हातपंप आहे. परंतु त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. दूषित पाणी पिल्याने आमचे आरोग्य बिघडले तर याला जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांनी यावेळी उपस्थित केला. सरपंच व ग्रामसेवकाकडे तक्रार करण्यासाठी गावकरी गेले असता, हे दोघेही ग्रामपंचायतीमध्ये हजर राहत नसल्याचा गावकर्यांचा आरोप आहे.