चंद्रपूर : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील ६०४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका १५ जानेवारी रोजी मतदान व १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
ज्या ग्रामपंचायतीचे मतदार क्षेत्रात निवडणूक होत आहेत, त्या क्षेत्रातील सर्व दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना यामधील कामगारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी १५ जानेवारी या मतदानाच्या दिवशी पगारी सुटी जाहीर करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहेत. निवडणुका नसलेल्या भागातील दुकाने, कंपन्या इ. वाणिज्यिक आस्थापना बंद ठेवण्याची आवश्यकता नसल्याचेही आदेशात पुढे म्हटले आहे.
जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणुका होत आहेत त्या क्षेत्रात १५ जानेवारी रोजी भरणारे आठवडी बाजार पुढे ढकलण्यात येत असून ते अन्य दिवशी भरविण्यात यावे, असेही आदेश जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी दिले आहेत.
आदेशाचे पालन न केल्यास संबंधित आस्थापनांविरूद्ध आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आदेशात नमूद केले आहे.