शोक संवेदना

By Admin | Updated: July 26, 2015 01:32 IST2015-07-26T01:32:22+5:302015-07-26T01:32:22+5:30

आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, ज्येष्ठ राजकीय नेते व राजकारणातील अजातशत्रू रा.सू. गवई यांच्या निधनाने देशातील आंबेडकरी चळवळीचे तसेच महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Condolence | शोक संवेदना

शोक संवेदना

देशाची हानी
चंद्रपूर : आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, ज्येष्ठ राजकीय नेते व राजकारणातील अजातशत्रू रा.सू. गवई यांच्या निधनाने देशातील आंबेडकरी चळवळीचे तसेच महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. लोकसभेचे खासदार, विधान परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच केरळ, बिहार व सिक्कीम राज्याचे राज्यपाल म्हणून त्यांनी सांभाळलेली जबाबदारी नेहमीच स्मरणात राहील. महाराष्ट्राच्या राजकारणातील जुन्या पिढीतील एक प्रभावी राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा सदैव उल्लेख होत राहील.
- ना. हंसराज अहीर
धर्मनिरपेक्ष नेत्याला देश मुकला
महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष, लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहातील खासदार आणि राज्यपाल अशा महत्त्वपूर्ण भूमिकांमधून वावरणारे ज्येष्ठ नेते रा.सू. गवई यांच्या निधनाने महाराष्ट्रासह विदर्भाचीही मोठी हानी झाली आहे. आंबेडकरी विचाराने चालणाऱ्या या दलित नेत्याने समाजाच्या प्रश्नासाठी भूमिका घेत धर्मनिरपेक्षपणाला नेहमी साथ दिली. प्रगल्भ आणि संयमी नेतृत्व असलेल्या रा.सु. गवई यांनी ज्या धर्मनिरपेक्षपणे कार्य केले, ते महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही.
- नरेश पुगलिया, माजी खासदार
गवई हे राजकीय समज असलेले नेते
रा.सू . गवई हे प्रचंड राजकीय समज असलेले मोठे नेते होते. म्हणूनच जनता विश्वासाने त्यांच्या पाठीशी असायची. त्यांच्या निधनाने राज्यातील राजकारणातील वैचारिकतेची मोठी हानी झाली आहे, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे यांनी दिली आहे. रा.सू. गवई यांचा चंद्रपूर जिल्ह्याशी जवळचा संबंध होता. बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे असताना त्यांच्या नेतृत्वात त्यांनी बरेच कार्य केले. रिपब्लिकन चळवळीतही गवई साहेब नेहमी आघाडीवर असत. नागपूर व चंद्रपूरच्या दीक्षाभूमीसाठी त्यांनी केलेले कार्य मोठे आहे. काँग्रेस व रिपब्लिकन युतीच्या काळात गवई हे दादासाहेबांसोबत होते. दलित भूमिहिनांना शेतजमिनी मिळवून देण्याच्या आंदोलनातही ते सक्रिय होते.
- शांताराम पोटदुखे, माजी मंत्री
गवर्इंच्या निधनाने आंबेडकर चळवळीतील झंझावात थांबला
रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते, केरळ, सिक्कीम व बिहार राज्याचे माजी राज्यपाल रा.सू. गवई यांच्या निधनाने फुले-आंबेडकरी चळवळीतील विचारांचा झंझावत थांबला आहे, अशा शब्दात विधिमंडळाचे उपगट नेता तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. विद्यार्थिदशेपासून सामाजिक व राजकीय चळवळीत सक्रिय सहभाग, ज्यांनी ३० वर्ष अखंडपणे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्यपद भूषविले, तसेच सभापती, उपसभापती, विरोधीपक्ष नेते अशी विविध पदे भूषविणारे, ज्या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा दिली अशा दीक्षाभूमीवर ऐतिहासिक बौद्ध स्तुप साकारण्यात सिंहाचा वाटा उचलणारे, तसेच अस्पृशता निर्मूलन, कुष्ठरोग या क्षेत्रात भरीव काम करणारे रा.सु.गवई यांचा राज्याच्या आणि देशाच्या राजकीय चळवळीत सक्रिय सहभाग होता. उपेक्षित, दलित, आदिवासी आणि बहुजनांच्या प्रश्नावर सातत्याने लढा देणारा रा.सू. गवई या नेत्याला महाराष्ट्र कायमचा अंतरला आहे.
- आ. विजय वडेट्टीवार

Web Title: Condolence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.