संगणक परिचालकांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:29 IST2019-09-03T00:28:08+5:302019-09-03T00:29:55+5:30

संग्राम व आपले सरकार प्रकल्पात मागील ८ वर्षांपासून संगणक परिचालक प्रामाणिकपणे कार्य करीत आहेत. संगणक परिचालकांच्या माध्यमातून राज्यशासनाला केंद्रशासनाकडून सलग ३ वेळा प्रथम क्रमांक तर एखदा व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. सदर संगणक परिचालकांनी रात्रदिवस काम करून शेतकरी कर्जमाफी योजना यशस्वी केली.

Computer operators hold | संगणक परिचालकांचे धरणे

संगणक परिचालकांचे धरणे

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना : मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्यातील ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार प्रकल्पात काम करणारे हजारो संगणक परिचालकांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या मागण्या सोडविण्याचे निवेदन दिले होते. मात्र त्यांची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे राज्यातील सर्व पंचायत समितीसमोर संगणक परिचालकांनी एकदिवसीय धरणे आंदोलन केले.
संग्राम व आपले सरकार प्रकल्पात मागील ८ वर्षांपासून संगणक परिचालक प्रामाणिकपणे कार्य करीत आहेत. संगणक परिचालकांच्या माध्यमातून राज्यशासनाला केंद्रशासनाकडून सलग ३ वेळा प्रथम क्रमांक तर एखदा व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. सदर संगणक परिचालकांनी रात्रदिवस काम करून शेतकरी कर्जमाफी योजना यशस्वी केली. सध्या सुरू असलेली प्रधानमंत्री आयुष्यमान योजना यासह अनेक योजनेची कामे संगणक परिचालक करत आहेत. परंतु, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे संगणक परिचालकांना सहा महिने ते एक वर्ष मानधन मिळत नाही. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे नियमीत वेतनाच्या मागणीसाठी संगणक परिचालकांनी अनेकदा आंदोलने केले. मुंबई येथील आंदोलनदरम्यान मुख्यमंत्र्यांनी सर्व संगणक परिचालकांना आय. टी महामंडळात घेण्याचे आश्वासन दिले. परंतु, आठ महिने होऊनही शासनाने कोणताही निर्णय न दिल्यामुळे राज्यातील सर्व संगणक परिचालकांनी एकाच दिवशी आंदोलन केले. त्याअनुषंगाने चंद्रपूर येथील पंचायत समितीसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष दिनेश बावणे, विवेक डोर्लीकर, मोहन धोटे, विकास ढोके, कैलास पुरमशेट्टीवार, नितेश काकडे, जैनाब पठाण यांच्यासह अनेक संगणक चालक सहभागी होते.

Web Title: Computer operators hold