बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:11 IST2017-12-18T00:11:37+5:302017-12-18T00:11:59+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला.

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या
आॅनलाईन लोकमत
आवाळपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. अनेक शेतकऱ्यांचे कापूस पीक पुर्णपणे नष्ट होण्याचा मार्गावर असून काही शेतकऱ्यांचे पीक पूर्ण नष्ट झाले आहे. याची दखल घेत आ. संजय धोटे यांच्या नेतृत्वात भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
बोंड अळीचा प्रादुर्भाव अचानकपणे झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यात अनेकांचे कापूस पीक नष्ट झाले आहे. तसेच कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात बोंड अळीने ग्रस्त शेतकऱ्यांची संख्या शेकडोच्या घरात आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनातर्फे आर्थिक द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत शासनस्तरावर लवकर निर्णय घेवून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पाऊले उचलावी, अन्यथा शेतकऱ्यांना विविध संकटांना सामना करावा लागणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
धान उत्पादकांनाही मदत द्यावी
यावर्षी धान पिकावर मावा-तुडतुडा रोगाने आक्रमण केल्याने अनेकांचे पीक नष्ट झाले. काही शेतकऱ्यांनी धानाची कापणीही केली नाही. अनेकांच्या उभ्या पिकाची तणस झाल्याने काही शेतकºयांनी उभ्या धान पिकाला आग लावून दिल्याचे दुदैवी प्रकार घडले आहेत. शासनाने सर्वेक्षणाचे आदेश दिले असले तरी कापणी झाल्याने अनेक शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने सर्वांना आर्थिक मदतीची मागणी केली आहे.