नगरपरिषदेत समाविष्ट गावातील सामूहिक नेतृत्व ‘खालसा’
By Admin | Updated: May 26, 2017 00:18 IST2017-05-26T00:18:54+5:302017-05-26T00:18:54+5:30
नगरपरिषदेच्या माध्यमातून नागभीड नगरपरिषदेत समाविष्ट करण्यात आलेल्या त्या गावांचा विकास होईलही.

नगरपरिषदेत समाविष्ट गावातील सामूहिक नेतृत्व ‘खालसा’
प्रत्येक कामासाठी नागभीडची वारी : गावातील सरपंच, उपसरपंच पदे लुप्त
घनश्याम नवघडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : नगरपरिषदेच्या माध्यमातून नागभीड नगरपरिषदेत समाविष्ट करण्यात आलेल्या त्या गावांचा विकास होईलही. पण त्या गावांचे सामूहिक नेतृत्व कायमचे हिरावल्या गेले. त्यांचे छोटी-छोटी कामे गावातच होत होती. त्यासाठी त्यांना आता नागभीडलाच यावे लागणार अशा निराशाजनक प्रतिक्रिया नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर व्यक्त व्हायला लागल्या आहेत.
नागभीड नगरपरिषदेची निवडणूक २४ मे रोजी झाली. या नगरपरिषदेत डोंगरगाव, बाम्हणी, बोथली, चिखलपरसोडी, भिकेश्वर या जर लांबच असलेल्या गावांना लोकसंख्येच्या पूर्ततेसाठी समाविष्ट करून घेण्यात आले. नवखळा, सुलेझरी, तुकुम या गावांचे ठिक होते. ही गावे नागभीडला लागूनच होती. पण बाकी गावांचे काय, असा प्रश्नही यानिमित्ताने विचारला जात आहे.
भिकेश्वर-तुकुम-सुलेझरीमधून काँग्रेसने प्रतिक भसीन व भाजपने सचिन आकुलवार या बाम्हणी-डोंगरगाव या प्रभागातून काँग्रेसने दिनेश गावंडे व भाजपने नरेंद्र हेमणे या धनदांडग्यांना रिंगणात उतरविले यातील प्रतिक भसीन, दिनेश गावंडे, नरेंद्र हेमणे हे नागभीडचे रहिवासी आहेत. सचिन आकुलवार सुलेझरीचे सरपंच - उपसरपंच राहिले असले. तरी त्यांचीही कर्मभूमी नागभीडच राहिली आहे.
नागभीडच्या उमेदवारांपासून नवखळा आणि बोथली-परोडी हे दोन प्रभाग यावेळेस सुटले असले तरी भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत या प्रभागावर अतिक्रमण होणार नाही कश्यावरून?
भिकेश्वर-तुकुममधून भसीन किंवा आकुलवार, बाम्हणी-डोंगरगावमधून दिनेश गावंडे किंवा नरेंद्र हेमणे निवडून येतील. आपल्या राजकीय बळावर ते या गावांचा विकास करतीलही. पण या गावातील सामूहीक नेतृत्वाला जे ग्रहण लागले ते ग्रहण भविष्यातही सुटण्याची शक्यता नाही. बाम्हणी, डोंगरगाव, भिकेश्वर, बोथली, तुकुम या छोट्या छोट्या ग्रामपंचायती. या गावातील गावकरी आपआपल्या गावातुन सात-सात प्रतिनिधी निवडून द्यायचे. यातील एक सरपंच व्हायचा. एक उपसरपंच व्हायचा आणि हे ७ लोक आपल्या गावचा गाडा हाकायचे. गावातल्या समस्या गावातच सोडवायचे. आता या लोकांना प्रत्येक गोष्टीसाठी नागभीडवर अवलंबून राहावे लागणार आहे. साधा रहिवाशाचा दाखला लागला तरी नागभीडला यावे लागणार आहे. जेथे ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक गावकऱ्यांच्या तक्रारी ऐकण्याच्या मुडमध्ये नसायचा तेथे नगरपरिषदेचा मुख्याधिकारी आमचे खरच ऐकणार काय, अशी संतप्त भावनाही या गावकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
सरपंच, उपसरपंच आणि ग्रा.पं. सदस्य म्हणून मिरवणारे व गावाचे नेतृत्व करणारे या गावातील हे सामूहिक नेतृत्व आता कायमचे पडद्याआड गेले आहे.