ऐतिहासिक रामाळा तलावाची स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:50 IST2021-02-06T04:50:46+5:302021-02-06T04:50:46+5:30
चंद्रपूर : महानगरपालिका व वाल्मिकी मच्छुआ सहकारी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रामाळा तलाव स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सद्यस्थितीत पृथ्वी, वायू, ...

ऐतिहासिक रामाळा तलावाची स्वच्छता मोहीम
चंद्रपूर : महानगरपालिका व वाल्मिकी मच्छुआ सहकारी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रामाळा तलाव स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सद्यस्थितीत पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वासोबत जीवनपद्धती अंगीकारणे गरजेचे असल्याने या पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान हे राज्यातील ६६७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरू आहे. या अभियानांतर्गत जलस्रोत स्वच्छता मोहीम चंद्रपूर शहरात राबविण्यात येत आहे. गाळ वाल्मिकी मछुआ सहकारी संघटनेच्या मदतीने रामाळा तलावातील बाहेर काढून आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला. महानगरपालिकेतर्फे रामाळा तलावाच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. सुमारे ५०० वर्षांचा इतिहास लाभलेला रामाळा तलाव शहराच्या मध्यभागी असल्याने आकर्षणाचे केंद्र आहे. मात्र तलावाची स्वच्छता व सौदर्यीकरणासाठी जागृत होणे आवश्यक आहे. रामाळा तलावात कुठल्याही स्वरूपाचा कचरा विशेषतः प्लास्टिक व थर्माकोल टाकू नये, याकरिता मनपाकडून प्रयत्न केले जात आहेत.
माझी वसुंधरा अभियान राबविताना जल पंचतत्त्वानुसार तलाव संवर्धन, जैवविविधतेचे जतन, जलस्रोतांचे संरक्षण व संवर्धन, तलावांसह सार्वजनिक विहिरींची स्वच्छता, रेनवॉटर हार्वेस्टिंग, असे प्रकल्प शहरात राबविण्यात येणार आहेत. गोंडकालीन ऐतिहासिक बावडी - विहीर स्वच्छता अभियान मनपाकडून सुरु आहे. यावेळी स्वच्छता निरीक्षक भूपेश गोठे, वाल्मिकी मछुआ सहकारी संघटना, आरोही फाउंडेशन व एएसपीएम संस्थेच्या साक्षी कार्लेकर, महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.