सैराट वाहनचालकामुळे नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:30 AM2021-01-19T04:30:13+5:302021-01-19T04:30:13+5:30
मूल : येथील विश्राम गृह मार्गावर मागील अनेक दिवसांपासून काही युवक सैराटपणे वाहन पळवीत आहेत. याकडे पोलीस प्रशासनाचे ...
मूल : येथील विश्राम गृह मार्गावर मागील अनेक दिवसांपासून काही युवक सैराटपणे वाहन पळवीत आहेत. याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते.
उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे धुळीचे साम्राज्य
वरोरा : येथील रेल्वे फाटकामुळे नागरिकांना तासनतास ताटकळत राहावे लागत होते. हा त्रास दूर करण्यासाठी उड्डाणपूल बनविण्यात आला. मात्र येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. संबंधित विभागाने त्याची तात्पुरती दुरुस्ती केली. मात्र येथून वाहन गेल्यास मोठ्या प्रमाणात धूळ उडते. त्यामुळे वाहनचालकांना अडचण होत आहे.
बांधकाम कामगार योजनांपासून वंचित
चंद्रपूर : बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या बांधकाम व इतर कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ विविध योजना राबवित आहे. कर्मचाऱ्यांच्या उदासीन धोरणांमुळे योजनेचा लाभ मिळत नाही.
कोरपना ते वणी मार्गाची दुर्दशा
कोरपना : तालुक्यातील कोरपना ते वणी मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. परिणामी वाहतूकदारांना नाहक त्रास सहन करावा लागते आहे. आज घडीला या रस्त्यावर चारशे ते पाचशे खड्डे पडले असून दुचाकीनेही जाणे कठीण झाले आहे.
पडोली चौकातील अतिक्रमण हटवा
पडोली : नागपूर-चंद्रपूर मुख्य मार्गावर असलेल्या पडोली चौकात काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रहदारीस मोठी अडचण होत आहे. सध्या कोरोनामुळे चौकात गर्दी कमी आहे. असे असले तरी अन्य वेळी हा चौक सतत गजबजलेला असतो. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
‘ते’ विद्युत खांब बदलविण्याची मागणी
चंद्रपूर : येथील अनेक वॉर्डातील रस्त्यालगत असलेले विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलविण्याची मागणी होत आहे. यापूर्वी अनेकदा सदर खांब बदलविण्याची मागणी नागरिकांकडून झाली आहे. परंतु, याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे धोका होण्याची शक्यता आहे.
सार्वजनिक शौचालयाकडे दुर्लक्ष
गोंडपिपरी : शहर स्वच्छ व हगणदारीमुक्त करण्यासाठी नगर पंचायतीतर्फे शहरात सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम केले. मात्र याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी दुर्गंधी पसरली आहे. अनेकदा नगरसेवकांना सांगूनही स्वच्छता करण्यात आली नाही.
इंटरनेटअभावी शेकडो ग्राहक त्रस्त
सावली : तालुक्यातील बहुतांश गावात इंटरनेसेवा ढिम्म असल्याने नागरिकांना व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, काही बँकांमध्येही हीच समस्या असल्यामुळे ग्राहकांना ताटकळत रहावे लागते. त्यामुळे इंटरनेट सेवा सुरळीत करावी, अशी मागणी आहे.
प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर वाढला
चंद्रपूर : राज्यात प्लॅस्टिक पिशवीवर बंदी घातली आहे. मात्र लॉकडाऊन काळात प्लॅस्टिकचा सर्रास वापर सुरू आहे. कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येते. गाडीच्या डिक्कीत एखादी कापडी पिशवी घालून भाजीपाला आणत होते. अलीकडे कॅरीबॅग सहज मिळत आहे.
सिस्टर कॉलनीतील पथदिवे बंद
चंद्रपूर : येथील नगीनाबाग प्रभागातील सिस्टर कॉलनी येथील पथदिवे मागील आठ दिवसांपासून बंद आहेत. रात्री ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महानगरपालिकेने पथदिवे दुरुस्त करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. पथदिवे दुरुस्त करण्याची मागणी आहे.
शहरातील नाल्यांची स्वच्छता करावी
चंद्रपूर : शहरातील काही नाल्यांचा उपयोग कचरा टाकण्यासाठी होत असल्याने नाल्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. त्यामुळे परिसरात घाण पाणी साचत असल्याने आरोग्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महापालिका प्रशासनाने नाल्यांची स्वच्छता करावी, अशी मागणी आहे.
बंद असलेल्या नळयोजना सुरू कराव्या
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांत नळयोजना बंद आहेत. त्यामुळे हिवाळ्यातच पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन बंद असलेल्या नळयोजना त्वरित सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
रोहयोची कामे सुरू करण्याची मागणी
चंद्रपूर : काही गावांतील मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या संकटामुळे गावातील काही नागरिकांकडे कामच नसल्यामुळे त्यांना कुटुंबाचे पालनपोषण करताना अडचण येत आहे.
बेरोजगारांना हवा आर्थिक आधार
वरोरा : तालुक्यात बेरोजगारांची संख्या अधिक असून त्यांच्या हाताला काम द्यावे, अशी मागणी केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी सामाजिक संस्थेचे बेरोजगार मेळावा आयोजित करून प्रशिक्षण दिले होते. दरम्यान, खाणीमध्ये काही कामगार कामाला जातात. मात्र त्यांच्या पाल्यांना काम नसल्याने नोकरीच्या शोधात इतरत्र भटकत आहे. शासनाने विविध योजना राबवून हाताला काम द्यावे, अशी मागणी केली जात आहे.