चिमूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची अद्याप प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:28 IST2021-02-10T04:28:45+5:302021-02-10T04:28:45+5:30
चिमूर : चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी मागील पाच दशकापासून होत आहे. चिमूर क्रांती जिल्हा व चिमूर अपर जिल्हाधिकारी कार्यालय, ...

चिमूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची अद्याप प्रतीक्षाच
चिमूर : चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी मागील पाच दशकापासून होत आहे. चिमूर क्रांती जिल्हा व चिमूर अपर जिल्हाधिकारी कार्यालय, चिमूरकरांची तळमळ आहे. दोन वर्षांपासून चिमूर अपर जिल्हाधिकारी कार्यालयास मागील भाजप सरकारमधील तत्कालीन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासह सहा पद मंजूर करून कार्यालयाची व्यवस्था चिमूर येथील प्रशासकीय भवनात केलेली होती. मात्र १३ महिन्यांचा कालावधी होऊनसुद्धा आजपर्यंत अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झालेले नाही.
दरम्यान, हे कार्यालय तत्काळ सुरू करण्याची मागणी चिमूर तालुक्यातील पत्रकारांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
चिमूर तालुक्याचा व शहराचा विचार करता चंद्रपूर जिल्ह्यातील ९३ ग्रा.पं. मिळून बनलेला सर्वांत मोठा तालुका आहे. या शहराने १६ ऑगस्ट १९४२ इंग्रजाविरुद्ध आंदोलन करून बंड पुकारला होता. या आंदोलनात अनेक स्वातंत्रवीरांना वीरगती प्राप्त झाली तर अनेकांना फासावर लटकविण्यात आले. स्वातंत्रवीरांकडून अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांचा वध करून चिमूर शहर तीन दिवस स्वतंत्र राहिले होते. चिमूर कांतिजिल्हा निर्मितीची मागणी १९७०पासून अविरत सुरू आहे. त्या आनुषंगाने देशाचे तत्कालीन राष्ट्रपती यांनी ७ ऑगस्ट १९९३मध्ये महाराष्ट्र सरकारला चिमूर जिल्हा निर्मितीबाबत पत्र लिहिले होते. तसेच देशाचे तत्कालीन प्रधानमंत्री यांनी सुद्धा २४ ऑगस्ट १९९३ला महाराष्ट्र सरकारला जिल्ह्याबाबत पत्र लिहिले. त्यामुळे चिमूर जिल्हा मागणीसाठी तालुक्यातील जनता आग्रही व भावनिक बनली आहे. जनतेद्वारे अनेक आंदोलन, मोर्चे, उपोषणे करण्यात आली. दरम्यान, मागील भाजपा शासनातील विधान परिषदेचे माजी आमदार मितेश भांगडिया व आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडे लावून धरली होती. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी १६ ऑगस्ट २०१९ ला चिमूर अ्पर जिल्हाधिकारी कार्यालयास मंजुरीची घोषणा केली होती. त्यानंतर मंजुरीही दिली. अपर जिल्हाधिकारी या पदासह सहा कार्यालयीन पदांनाही मंजुरी दिलेली आहे. मात्र आस्थापनेपासून १३ महिन्यांचा कालावधी होऊनही चिमूर अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झालेले नाही.
त्यामुळे चिमूर अपर जिल्हाधिकारी कार्यालय तत्काळ सुरू करावे, अशी मागणी पत्रकार संघटनेचे कलीम शेख, चुन्नीलाल कुडवे, मनोज डोंगरे, राजकुमार चूनारकर, रवींद्र गोंगले , ज्ञानेश्वर जुमनाके, सूरज नरुले, गणपत खोबरे, रामदास हेमके, राजू रामटेके, उमेश शभरकर, भरत बडे, रामदास ठुसे, प्रमोद राऊत व इम्रान कुरेशी आदी पत्रकार उपस्थित होते.