चिमूर क्रांती भूमीच्या इतिहासावर चित्रपट काढणार
By Admin | Updated: August 17, 2015 00:40 IST2015-08-17T00:40:49+5:302015-08-17T00:40:49+5:30
चिमूर स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पाहता तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या क्रांतिकारी भजनाने देशात चिमूर या गावाने सर्वप्रथम क्रांती करून स्वतंत्र झाले.

चिमूर क्रांती भूमीच्या इतिहासावर चित्रपट काढणार
अजिंक्य देव : शहीद स्मृती दिन कार्यक्रमात सहभाग
चिमूर : चिमूर स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पाहता तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या क्रांतिकारी भजनाने देशात चिमूर या गावाने सर्वप्रथम क्रांती करून स्वतंत्र झाले. मी अशा भूमीच्या दर्शनाने धन्य झालो. माझ्या वडिलांची चित्रपट निर्मीती कंपनी असून या चिमूरच्या इतिहासावर आधारित तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनचरित्रावर चित्रपट काढणार असल्याची ग्वाही मराठी सिनेअभिनेता अजिंक्य देव याने येथे दिली.
शहिद स्मृती दिन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रमाप्रसंगी रविवारी सिनेअभिनेता अजिंक्य देव याचे येथे आगमन झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ह.भ.प. लक्ष्मणराव काळे महाराज तर उद्घाटक म्हणून आमदार विजय वडेट्टीवार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, किरण वडेट्टीवार, अशोक चरडे, प्रफुल्ल खापर्डे, सुनिल मैद, संजय डोंगरे, माधव बिरजे, देवानंद गावंडे, पंजाबराव गावंडे आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, या भूमीने मला मोठे केले. महाराष्ट्राचा मंत्री बनविला. या भूमीला कदापी विसरणार नाही. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी सदैव तयार असून त्यांच्या कायम पाठीशी आहे. वाघ वाचविण्याकडे सरकार लक्ष देते. परंतु शेतकऱ्याच्या दयनीय अवस्थेकडे लक्ष देत नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. आजपर्यंत ज्या शेतकऱ्याला न्याय न मिळाला नाही, त्यांच्यासाठी माझे दार खुले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा चित्रपटात चिमूरचा इतिहास समाविष्ठ करून चित्रपट निर्मितीचे त्यांनी स्वागत केले.
प्रसिद्ध कीर्तनकार काळे महाराज यांनी राष्ट्रसंताना भारतरत्न देण्याची मागणी केली. राष्ट्रससंताना पडद्यावर चित्रपटाच्या माध्यमातून आणण्याची विनंती केली. प्रास्ताविक राजू देवतळे यांनी केले. संचालन सुधीर पोहनकर यांनी केले. दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. शहिदांना पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. स्वातंत्र्यविरांच्या विधवा पत्नींना साडी देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)