वीटभट्टी ठरत आहेत अनेकांसाठी आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:43 IST2021-02-23T04:43:32+5:302021-02-23T04:43:32+5:30
तालुक्यात जवळपास २ हजार मजूर वीटभट्ट्यांवर कार्यरत आहेत. ...

वीटभट्टी ठरत आहेत अनेकांसाठी आधार
तालुक्यात जवळपास २ हजार मजूर वीटभट्ट्यांवर कार्यरत आहेत. मातीची घरे बांधणे जवळजवळ बंद झाल्याने विटांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अनेक मोठी शासकीय बांधकामही या व्यवसायास पूरक ठरत आहेत. सध्या शासनाकडून विविध योजनांमधून ग्रामीण व शहरी भागात घरकुलांचे मोठ्या प्रमाणावर वितरण सुरू आहे. याचाही फायदा वीटभट्टी चालकांना मिळत आहे.
धानाचा हंगाम संपला की दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात या व्यवसायाला सुरुवात होते. तालुक्यात जवळजवळ २०० विटाभट्टी आहेत. एका वीटभट्टीवर किमान २० मजूर काम करतात. काही भट्टींवर ५० ते ६० मजूर असतात.
मजुरांना पुढच्या हंगामासाठी अग्रीम रक्कम
विटाभट्टी व्यवसायावर अवलंबून असलेल्या मजुरांना रोजगार उपलब्ध झाला नाही, तर ते मजुरीच्या शोधात स्थलांतर करतात. विटाभट्टी चालकांना हीच भीती सतावत आहे. मजुरांनी कामाच्या शोधात स्थलांतर केले तर नंतर मजूर आणायचे कुठून म्हणून काही व्यावसायिक हंगाम संपल्याबरोबर पुढच्या हंगामासाठी काही रक्कम अग्रीम म्हणून देत असतात.