दोन्ही मारेकऱ्यांना अटक, कोळशाच्या वादातून घडले हत्याकांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:38 IST2021-02-05T07:38:37+5:302021-02-05T07:38:37+5:30
राजुरा : राजुरा येथे नाका क्रमांक ३ परिसरातील एका सलूनमध्ये देशीकट्ट्यातून चार गोळ्या झाडून ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजू यादव यांची ...

दोन्ही मारेकऱ्यांना अटक, कोळशाच्या वादातून घडले हत्याकांड
राजुरा : राजुरा येथे नाका क्रमांक ३ परिसरातील एका सलूनमध्ये देशीकट्ट्यातून चार गोळ्या झाडून ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजू यादव यांची हत्या झाली. या प्रकरणातील मारेकऱ्यांना राजुरा पाेलिसांनी घटनेनंतर काही तासातच अटक करण्यात यश मिळविले. चंदन शीतलाप्रसाद सिंग (३०) व सतेंद्रकुमार परमहंस सिंग (२०), अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
हे हत्यांकांड कोळशाच्या वादातून घडल्याचे बोलले जात आहे. पोलीस तपासात पुन्हा काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे. राजू यादव हे रविवारी मयूर हेअर सलूनमध्ये दाढी करीत असताना त्यांच्या मागावर असलेले चंदन व सतेंद्रकुमार हे दोघे सलूनमध्ये सिनेस्टाईल हातात देशीकट्टा घेऊन शिरले. काही कळायच्या आत त्या दोघांनी राजू यादववर चार गोळ्या झाडल्या. यामध्ये यादव यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी एमएच ३४ बीटी २५२४ क्रमांकाची मोटारसायकल सोडून पसार झाले होते. या घटनेनंतर राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, ठाणेदार चंद्रशेखर बहादुरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी प्रशांत साखरे, चेतन टेंभुर्णे, संपत पुलिपाका, श्रीकांत चन्ने यांनी चौकशीला वेग देत मारेकरी चंदन शीतलाप्रसाद सिंग व सतेंद्रकुमार परमहंस सिंग यांना काही तासातच अटक केली. पुढील तपास राजुराचे ठाणेदार चंद्रशेखर बहादुरे करीत आहेत. या घटनेने चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असल्याचे पुन्हा एकवार सिद्ध झाले आहे. यापूर्वी बल्लारपूरात सूरज बहुरिया हत्याकांडही या पद्धतीने घडले होते.