वीजपुरवठा खंडितप्रकरणी भाजयुमोचा अल्टिमेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:29 IST2021-03-17T04:29:09+5:302021-03-17T04:29:09+5:30
भद्रावती : जागतिक महामारी कोरोना काळात जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक लोकांना विजेचे बिल भरता आले नाही. महाराष्ट्र विद्युत वितरण ...

वीजपुरवठा खंडितप्रकरणी भाजयुमोचा अल्टिमेटम
भद्रावती : जागतिक महामारी कोरोना काळात जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक लोकांना विजेचे बिल भरता आले नाही. महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीने कनेक्शन कापण्याचा सपाटा सुरू केला आहे. या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या दोन पदाधिकाऱ्यांनी स्थानिक बीएसएनएल टॉवरवर चढून वीरूगिरी आंदोलन सुरू केले. या वीरूगिरी आंदोलनाची दखल घेत तहसीलदार महेश घटनास्थळी पोहोचले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मोबाईलवर चर्चा केल्यानंतर दोन्ही आंदोलकांना टॉवरवरून खाली उतरविले.
भाजयुमोचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान व ग्रामीण जिल्हा सचिव केतन शिंदे या दोघांनी टॉवरवर चढून वीरूगिरी आंदोलनाला सुरुवात केली. शासनाने अधिवेशनादरम्यान कुणाचेही वीज कनेक्शन कापले जाणार नसल्याचे आदेश दिले होते. परंतु, अधिवेशन संपताच शासनाने आपले आदेश परत घेतले असून, शेतकरी, कृषी पंपधारक, दुकानदार, घरगुती वीज कनेक्शन कापण्याची मोहीम सुरू केली आहे. कोरोना महामारीमुळे शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिक अडचणींचा सामना करीत आहे. अनेकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. अशा स्थितीत वीज मंडळाकडून मनमानी कारभार सुरू केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी १६ मार्च रोजी बैठकीद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्स माध्यमातून राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दुपारी जवळपास अडीच वाजता दोघेही आंदोलक टाॅवरवरून खाली उतरले. १६ मार्च रोजी तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.