रोवणीनंतरचा तो संस्कार आजही कायम
By Admin | Updated: August 18, 2015 01:05 IST2015-08-18T01:05:37+5:302015-08-18T01:05:37+5:30
अनेक प्रथा परंपरा काळाच्या ओघात गडप झाल्या. पण या भागात धान रोवणीनंतर जो संस्कार केल्या तो काळाच्या कसोटीवर

रोवणीनंतरचा तो संस्कार आजही कायम
घनश्याम नवघडे ल्ल नागभीड
अनेक प्रथा परंपरा काळाच्या ओघात गडप झाल्या. पण या भागात धान रोवणीनंतर जो संस्कार केल्या तो काळाच्या कसोटीवर खऱ्या अर्थाने उतरला असून तो संस्कार आजही पुर्ण केल्या जात आहे.
पुर्व विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यात धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. हे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक दिव्य पार पाडावी लागत असली तरी शेतकरी अतिशय श्रद्धेने ते पार पाडत असतो. याचा शेवट, गोड आनंदात आणि समाधान पुर्ण वातावरणात व्हावा, या हेतुनेच या संस्काराची प्रथा पडली असावी असे बोलल्या जाते.
ज्या शेतकऱ्यांचे ज्या दिवशी रोवणे संपत,े त्या दिवशी रोवणी संपलेल्या बांधीतून डब्यांमध्ये चिखल घेतल्या जाते. डब्यामध्ये घेतलेले चिखल रोवणी करणाऱ्या महिलांकडून शेतमालकांच्या अंगावर उडविल्या जाते. तास अर्धातास हा खेळ चालल्यानंतर रोवणी करणाऱ्या शेतमालकाच्या घरी येतात. त्यानंतर अंगणात पाट ठेवण्यात येतो. महिलांकडून शेतमालकाचे पाय धुण्यात आल्यानंतर ओवाळणी करण्यात येते. यावेळी शेतमालक भेट म्हणून काही रक्कम देत असतात.
यानंतर शेतातून आणलेल्या चिखलाने शेतमालकाच्या घराच्या भिंतीवर नांगर, फण, धान्य ठेवण्याचे ढोले यांचे चित्र काढण्यात येते. रोवणी करणाऱ्या महिलांकडून अक्षता लावून या चित्रांचेही पूजन केल्या जाते. पूजनाचा हा कार्यक्रम पार पडल्यानंतर शेतकरी रोवणी करणाऱ्या महिलांना आपल्या ऐपतीप्रमाणे नास्ता किंवा जेवणाचा कार्यक्रम ठेवित असतो.
धानपट्टयात कमी अधिक प्रमाणात या प्रथेचे आजही पालन केल्या जात आहे. अनेक परंपरा, संस्कार काळाच्या उदरात गडप झाले. मात्र ही परंपरा आजही ग्रामीण भागात कायम आहे.