बालभारतीकडे मागविली साडेअकरा लाख पाठ्यपुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:09 IST2019-04-24T00:08:26+5:302019-04-24T00:09:15+5:30

इयत्ता १ ते ५ आणि ६ ते ८ वीत शिक्षणाऱ्या १ लाख ७९ हजार ७३६ विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्र सुरू होताच पाठ्यपुस्तकांची अडचण निर्माण होऊ नये, याकरिता जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने पुण्यातील बालभारतीकडे साडे अकरा लाख पाठ्यपुस्तकांची आॅनलाईन मागणी नोंदविली.

About half a million textbooks have been asked by Bal Bharati | बालभारतीकडे मागविली साडेअकरा लाख पाठ्यपुस्तके

बालभारतीकडे मागविली साडेअकरा लाख पाठ्यपुस्तके

ठळक मुद्देजिल्ह्यात १ लाख ७९ हजार ७३६ विद्यार्थी : यंदा बंगाली भाषिक विद्यार्थ्यांनाही मिळणार पाठ्यपुस्तके

राजेश मडावी।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : इयत्ता १ ते ५ आणि ६ ते ८ वीत शिक्षणाऱ्या १ लाख ७९ हजार ७३६ विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्र सुरू होताच पाठ्यपुस्तकांची अडचण निर्माण होऊ नये, याकरिता जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने पुण्यातील बालभारतीकडे साडे अकरा लाख पाठ्यपुस्तकांची आॅनलाईन मागणी नोंदविली. विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच बंगाली भाषिक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिका, शासकीय, अनुदानित प्राथमिक शाळांमधील १ ते ५ वीत शिक्षणाºया विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत प्रतिलाभार्थी २५० तसेच उच्च प्राथमिक शाळेतील ६ ते ८ वीत शिकणाऱ्यांना प्रति लाभार्थी ४०० रूपये दिल्या जाते. विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून आता यू- डायस ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यावरील विद्यार्थी संख्येच्या नोंदणीनुसार ई-बालभारती पोर्टल पाठ्यपुस्तकांची नोंदणी करण्याच्या सूचना समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक वंदना कृष्णा यांनी दिल्या होत्या. गतवर्षी राज्यातील ३५ जिल्हा परिषदांपैकी ५ आणि २२ पैकी ३ महानगरपालिकांनी विहित मुदतीत पाठ्यपुस्तकांची नोंदणी न केल्याने शैक्षणिक सत्र सुरू होऊनही विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागले होते. यंदा अशी समस्या उद्भवू नये, याकरिता आॅनलाईन नोंदणी करण्याचे मार्च महिन्यातच कळविण्यात आले होते.
दरम्यान, विदर्भातील अन्य जिल्हा परिषदांच्या तुलनेत यंदा चंद्रपूरने नोंदणी करण्यात आघाडी घेतली. जिल्ह्यात बंगाली माध्यमाच्या दोन शाळा आहेत. तेथील विद्यार्थ्यांना यंदापासून पाठ्यपुस्तके देण्याचा निर्णय घेण्यात आला.

पाठ्यपुस्तके पंचायत समितीला पाठविणार
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून यंदा पंचायत समित्यांनी बालभारतीकडे पाठ्यपुस्तकांची परस्पर नोंदणी केली. कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार १९६७ रोजी पुणे येथे बालभारतीची स्थापना झाली. मागील वर्षी बालभारतीने राज्यभरात १ कोटी टेक्सबूक व अडीच कोटी वर्कबूक विद्यार्थ्यांना वितरीत केले होते. पोर्टलवर नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्यांमध्ये ही पाठ्यपुस्तके थेट पुण्यावरून पाठविण्यात येणार आहे.

मुख्याध्यापकांना बसणार भुर्दंड
पुस्तकांच्या वाहतुकीसाठी गतवर्षी मुख्याध्यापकांनी स्वत:च्या खिशातून पैसे भरले होते. त्यामुळे ही पाठ्यपुस्तके पंचायत समिती व केंद्र शाळेवर न पाठविता प्रत्येक शाळेवर पाठविण्याची व्यवस्था मुख्यापक संघटनेने केली. अंतर्गत शाळांच्या पाठ्यपुस्तक वाहतुकीचा खर्च शासनाकडून दिला जात नाही.

मराठी, हिंदी, तेलगू, उर्दू , बंगाली माध्यमातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांना नवीन सत्रात पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे संच वितरण करण्याचे नियोजन केले आहे. कुणीही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याकरिता यु-डायसवरील नोंदणीवरून बालभारतीकडे पाठ्यपुस्तकांची मागणी केली आहे.
- दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) चंद्रपूर

Web Title: About half a million textbooks have been asked by Bal Bharati