समितीसमोर १४ शेतकरी आत्महत्याप्रकरणे सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 05:00 AM2020-10-02T05:00:00+5:302020-10-02T05:00:26+5:30
अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली वीस कलमी सभागृहात नियंत्रण समितीची सभा पार पडली. यावेळी शेतकरी आत्महत्यांची एकूण १४ प्रकरणे सादर करण्यात आली. यामध्ये सात प्रकरणे पात्र, तीन प्रकरणे अपात्र तर चार प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस विभागामार्फत शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणीबाबत बुधवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली वीस कलमी सभागृहात नियंत्रण समितीची सभा पार पडली. यावेळी शेतकरी आत्महत्यांची एकूण १४ प्रकरणे सादर करण्यात आली. यामध्ये सात प्रकरणे पात्र, तीन प्रकरणे अपात्र तर चार प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत.
जिल्ह्यात ऑगस्ट २०२० पर्यतच्या शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणीचा आढावा घेण्यात आला. ज्या शेतकऱ्यांचे नापीकी, कर्जबाजारीपणा, कर्जपरतफेडीचा तगादा, या तीन कारणानी आत्महत्या केल्यास शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येते. शेतकरी कर्जबाजारीपणा आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या वारसास मदत देण्याबाबत आढावा घेण्यात आला. ज्या शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणामुळेच आत्महत्या करण्यात आलेले त्यांच्या वारसाना मदत मिळेल असे तालुकास्तरीय समितीने अहवालात मत व्यक्त केले आहे. इतर कारणाने आत्महत्या करण्यात आलेल्या शेतकºयांना हे लाभ मिळणार नाही, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, तहसीलदार सचिन पाटील, जिल्हा सामान्य रूग्णालयाचे गजेंद्र्र मेश्राम, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस.एन.झा, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रमोद गेडाम, विवेक कोहळे व पोलीस अधीक्षक कार्यालयांचे प्रतिनिधी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रतिनिधी, सर्व संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.