१०० कोटींचे सिंचन प्रकल्प धूळ खात

By Admin | Updated: August 4, 2015 00:42 IST2015-08-04T00:42:15+5:302015-08-04T00:42:15+5:30

राजुरा विधानसभा क्षेत्रातील १०० कोटींचे सिंचन प्रकल्प मागील अनेक वर्षांपासून धूळ खात पडले आहेत.

100 crore sprinkler irrigation projects | १०० कोटींचे सिंचन प्रकल्प धूळ खात

१०० कोटींचे सिंचन प्रकल्प धूळ खात

राजुरा विधानसभा क्षेत्र: प्रकल्पांचा केवळ उद्योजकांना फायदा
बी.यू. बोर्डेवार राजुरा
राजुरा : राजुरा विधानसभा क्षेत्रातील १०० कोटींचे सिंचन प्रकल्प मागील अनेक वर्षांपासून धूळ खात पडले आहेत. भेंडाळा सिंचन प्रकल्पावर करोडो खर्च होऊनसुद्धा हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी अद्याप फायद्याचा ठरला नाही.
डोंगरगाव सिंचन प्रकल्पावर करोडो रुपये खर्च झाले. परंतु कालवे पूर्ण न झाल्यामुळे हा प्रकल्पसुद्धा मातीमोल झाला आहे. सोनापूर टोमटा सिंचन प्रकल्प व पकडीगुड्डम मध्यम सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांपेक्षा उद्योजकानाच फायद्याचा ठरत आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्रातील सिंचनाचा प्रश्न अजुनही संपुष्टात आलेला नाही. सिंचन वाढले पाहिजे, यासाठी या क्षेत्रामधील माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, अ‍ॅड. वामनराव चटप, सुभाष धोटे, सुदर्शन निमकर यांनी सिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान केले. वर्धा नदीचे करोडो लिटर पाणी वाहून जाणारे पाणी रोखण्यासाठी बंधारे बांधण्यासाठी माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर यांनी अनेकवेळा मागणी केल्ज़ परंतु पाण्याचा साठा वाढविण्यासाठी अजुनही प्रयत्न करण्याची गरज आहे. आता या जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्रीसुद्धा आहे. राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रातील सिंचनाची प्रकल्पे पूर्ण करण्यासाठी योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. या क्षेत्रात दिवसेंदिवस पाण्याचे प्रमाण कमी होत आहे.
उद्योजक मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा करीत असल्यामुळे जमिनीमधील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पुढील १० वर्षांत पाण्याचे नियोजन न झाल्यास राजुरा विधानसभा क्षेत्रात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. (शहर प्रतिनिधी)

कालव्यांचा दर्जा निकृष्ट
करोडो रुपये खर्च होऊनही मागील २० वर्षात पाण्यासाठी तयार झालेले सिंचन प्रकल्प पूर्ण होऊ शकले नाही, कालवे तयार झाले त्याचा दर्जासुद्धा तपासण्याची गरज आहे. सिंचनाचा प्रश्न गरीब शेतकऱ्यांशी जुळलेला आहे. शेतकरी रात्रंदिवस राबराब राबतो. परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे आणि सिंचनाच्या असुविधेमुळे राजुरा विधानसभा क्षेत्रातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

पाण्याच्या पातळीत
वाढ होणार
राजुरा शहरातील पाण्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. राजुराचे माजी आमदार सुभाष धोटे यांनी दोन कोटींचा निधी आणून राजुराच्या तलावाचे खोलिकरण केले. त्यामुळे शहरातील पाण्याच्या पातळीत नक्कीच भर पडणार नाही.

Web Title: 100 crore sprinkler irrigation projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.