सुलतानपुरात घरात शिरले पाणी,अनेकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:37 IST2021-09-25T04:37:39+5:302021-09-25T04:37:39+5:30
मागील २-३ दिवसांपासून सुलतानपूरसह परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. आशातच २३ सप्टेंबरला सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू असताना दुपारनंतर ...

सुलतानपुरात घरात शिरले पाणी,अनेकांचे नुकसान
मागील २-३ दिवसांपासून सुलतानपूरसह परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. आशातच २३ सप्टेंबरला सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू असताना दुपारनंतर अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला़ जवळपास एक तास पावसाने सुलतानपूर येथील वाॅर्ड क्र .५ ,६ व १ पूर्णत: जलमय झाले़ अनेकांच्या घरात गुडघ्यापर्यंत पाणी शिरल्याने अन्नधान्य भिजले संसारोपयोगी साहित्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने नागरिक शासन व प्रशासनाबाबत संताप व्यक्त करीत आहेत.
सुलतानपूर येथील वाॅर्ड क्र .१,५,६ ला लागून पंढरपूर -शेगांव पालखी राज्य महामार्ग गेला आहे़ दोन्ही बाजूला रोडच्या उंचीनुसार सिमेंटच्या नालीचे बांधकाम केले आहे. वाॅर्डातील पाणी या नालीमध्ये जाण्याच्यादृष्टीने तशा पध्दतीची व्यवस्था करणे आवश्यक होते. मात्र तसे न केल्याने हे पाणी नागरिकांच्या घरात जात आहे. तर वाॅर्ड क्र .५ व ६ च्या मधून वेणी रोड गेलेला आहे़ या रोडला पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी उताराच्या दिशेने नाली आवश्यक आहे़ मात्र नालीच बांधलेली नसल्याने पाणी ग्रामस्थांच्या घरात शिरत आहे़
अधिकाऱ्यांनी केली पाहणी
सुलतानपूर येथील ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरल्याची माहिती मिळताच लोणार पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पाटोळे , इंजि . शिंदे यांनी वाॅर्ड क्र. १ ,५ ,६ येथे भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी उपसरपंच प्रदीप सुरुशे , ग्रा.प. सदस्य जाकीरखॉ पठाण , संतोष शिंदे , शे . मुशाब्बर ग्रा.प. कर्मचारी सिध्देश्वर सुरुशे , भिकाजी भानापुरे उपस्थित होते .