पालेभाज्यांच्या हर्राशी परिसरात विविध समस्या
By Admin | Updated: August 11, 2014 22:48 IST2014-08-11T22:48:57+5:302014-08-11T22:48:57+5:30
शहरातील हर्राशीत कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे पालेभाज्यांच्या विक्रीसाठी येणार्या शेतकर्यासह हमाल आणि भाजी विक्रेत्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

पालेभाज्यांच्या हर्राशी परिसरात विविध समस्या
खामगाव: शहरातील हर्राशीत कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे पालेभाज्यांच्या विक्रीसाठी येणार्या शेतकर्यासह हमाल आणि भाजी विक्रेत्यांना त्रास सहन करावा लागत आहे. हर्राशीतील विविध समस्या निकाली काढण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी शेतकर्यांची आहे. खामगाव शहरात भाजीपाल्याची आवक प्रामुख्याने रात्री होते. तालुक्यासह इतर तालुक्यातील शेतकरी येथे भाजी विक्रीसाठी येतात. रात्री ८ वाजतापासून याठिकाणी बाहेरगावचे शेतकरी भाजीव्रिकीसाठी येतात. हर्राशी पहाटे साडेतीन-चार वाजता सुरू होत असली तरी हर्राशीत शेतमाल रात्रीच येतो. यासाठी शेकडो शेतकरी, हमाल रात्रीच हर्राशीत राहतात. रात्री १0 वाजता नंतर शहरातील हॉटेल, चहा टपर्या सुरू राहत नाहीत. त्यामुळे बाहेरगावच्या शेतकर्यासह हमालांना हर्राशीत रात्री उपाशी झोपण्याची वेळ येते. रात्रीच्यावेळी रेल्वेस्थानकावरील कॅन्टीन सुरू ठेवण्याची परवानगी आहे. परंतु, हे कॅन्टीन दूर पडते. शिवाय कॅन्टीनवर अथवा हर्राशीपासून दूर असलेल्या धाब्यावर चहा, नास्ता आणि जेवायचे म्हटल्यास शेतमाल चोरी जाण्याची भिती असते. त्यामुळे अनेक शेतकरी उपाशीपोटी झोपणे पसंत करीत असल्याचे चित्र आहे. शेतकरी आणि हमालांच्या समस्या निकाली काढण्याची मागणी पांडुरंग मिसाळ, श्रीराम राऊत, युवराज भेरडे, संतोष बावणे, राजू मदारीवाले, गजानन रोहणकार, दिलीप तायडे, बळीराम इंगळे यांनी केली आहे. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील अनेक हर्राशी बाजार परिसरात आहे. त्यामुळे दिवसभर शेतातील माल काढून हर्राशीसाठी भाजीपाला आणताना मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच रात्री हर्राशी परिसरात थांबून मालाचे रक्षण करण्यासाठी रात्री जागरण करावे लागतो. त्यामुळे अनेकांना त्रास होत असतो.
** बाजार समितीचा आदर्श घ्यावा
कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य खरेदीसाठी येणार्या शेतकर्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने केवळ एक रुपयांमध्ये उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था केली आहे. मात्र, शहरातील हर्राशीत पालिका प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था नाही. शहरातील रेल्वे स्थानकावर चहा आणि नास्त्याची व्यवस्था आहे. परंतु, हर्राशीत मालाची चोरी होत असल्याने दूरवर जाणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेकांना उपाशी पोटी झोपण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे. इतर कुठलिही व्यवस्था नसल्याने शेतकरी व हमालांना त्रास होतो.