जल जीवन मिशनअंतर्गत १२५५ गावांचे कृती आराखडे तयार करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:21 IST2021-07-24T04:21:06+5:302021-07-24T04:21:06+5:30
जिल्ह्यातील ग्रामीण भागात २०२४ पर्यंत प्रत्येक कुटुंबापर्यंत नळजोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट सध्या हाती घेण्यात आले आहे. त्यानुषंगाने प्राधान्याने ...

जल जीवन मिशनअंतर्गत १२५५ गावांचे कृती आराखडे तयार करणार
जिल्ह्यातील ग्रामीण भागात २०२४ पर्यंत प्रत्येक कुटुंबापर्यंत नळजोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट सध्या हाती घेण्यात आले आहे. त्यानुषंगाने प्राधान्याने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्तरावर गाव कृती आराखडा तयार करण्याच्या या प्रक्रियेत गावांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार यांनी केले आहे.
दरम्यान, या पंधरवड्यांतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता आणि जिल्हा कक्षाचे सनियंत्रण मूल्यमापन सल्लागार यांना ऑनलाइन गाव कृती आराखडे तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात माहिती संकलन, राबविण्याच्या प्रक्रियेसह अन्य बाबींची माहिती व प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासोबतच पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग, उपअभियंता, शाखा अभियंता, भूवैज्ञानिक, मनुष्यबळ विकास सल्लागार, पाणी गुणवत्ता सल्लागार, तालुकास्तरीय गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व संबंधितांनाही दुसऱ्या टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासोबतच २८ व २९ जुलै रोजी ग्रामपातळीवर सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, पंप ऑपरेटर, आशा वर्कर्स, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या दोन प्रतिनिधींनाही प्रशिक्षण दिले जाईल.
- मान्यतेसाठी ग्रामसभेत ठेवणार
स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये बनविण्यात आलेले हे गाव कृती आराखडे मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे यासंदर्भातील कामांना प्राधान्य दिले जावे. सोबतच मधल्या काळात या कृती आराखड्यांची पडताळणीही करण्यात येणार आहे. त्यामुळे या अभियानात ग्रामस्तरावरून मोठा सहभाग असणे आवश्यक असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.